मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

श्री गुरुदेव दत्त आणि गुरूंचे महत्व

श्रीगुरु दत्त, श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती, दत्ताचे अनेक अवतार. सर्व काही सामान्य जणांच्या भावविश्वात घर करून आहेत. भक्ती तेथे शक्ती ह्या उक्तीचा अनुभव देणारे श्रीगुरु दत्त महाराजांची आज जयंती. दत्त गुरूंचा जन्म अनुसया मातेच्या पावित्र्याच्या तेजातून झालेला आहे. दत्तगुरु ब्रम्हा, विष्णू आणि महेश ह्यांचा अवतार आहेत. सर्जनशीलता, विश्वनिर्मिती, विश्वपोषण, आणि विनाश करणाऱ्या शक्तींचा हा अवतार आहे. दत्तगुरु हे सामान्य जनतेचा देव आहेत.

चित्र: डॉ धनश्री बिडवाईक 

एकदा ह्या जगाचा निर्माता, ब्रम्हाने सर्व सृष्टीला एकत्र केले आणि म्हणाले, “मनुष्य जोपर्यंत प्रगल्भ होत नाही तोपर्यंत त्याची शक्ती मी त्यांच्यापासून कोठेतरी लपवू इच्छितो. स्वतःची ओळख तयार झाल्यावर ह्या शक्तीचा ते उपयोग करू शकतील." 

पवन म्हणाला, “ते मला दे मी चंद्रात लपवून ठेवीन."

ब्रह्मदेव म्हणाले,” नाही. एक दिवस ते तेथे जाऊन ते शोधतील.”

मासा म्हणाला, “मी ते समुद्राच्या तळाशी नेईन .”

"नाही ते तिथेही जातील."

पृथ्वी म्हणाली, "मी ते माझ्यात संपूर्ण लपवून ठेवीन."

ब्रह्मदेव म्हणाले, “ते तुझे कवच कापून तेथेही शोधतील.”

शेवटी विष्णू म्हणाले, "ती शक्ती त्यांच्यातच लपवून ठेवा देवा." 

ब्रह्मदेवाने लगेच ती सर्व शक्ती मनुष्यातच मनात लपवून ठेवली. 

ती शक्ती, क्षमता म्हणजेच आपली अव्यक्त स्वयंशक्ती, ऊर्जा, धैर्य, माणुसकी, शांतता आणि आत्मविश्वास.

आपण सर्व काही बाहेर शोधतो, देवळात देव शोधतो, सर्वकाही बाहेर शोधतो. ह्या सर्व शक्ती आपल्यातच आहेत ह्याची जाणीव आपल्याला कधीच होत नाही. 

मनुष्यात अमर्याद सामर्थ्य लपलेले आहे. हाच संदेश दत्त गुरु देतात. जेव्हा स्वामी समर्थ, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" असे सांगतात, तेव्हा ते आपल्यात असणाऱ्या सामर्थ्याला आव्हान देत असतात. तू पुढे जा, मी पाठीशी आहे. जे काही करावे लागणार ते तुलाच करावयाचे आहे. ते करण्याचे सामर्थही तुझ्यात आहे. भिऊ नकोस. आत्मविश्वासाने पुढे जा...मी आहेच पाठीशी." हा स्वामींचा दिलासा आपल्याला यशाकडे, कर्तव्यपूर्तीकडे घेऊन जातो.  

कोणतीही अपेक्षा न ठेवता, मनापासून जर तुम्ही आराधना केली तर तो नक्कीच मदतीला येतो. दत्त आणि दत्ताचे अवतार पुरुष हे अगदी साधे अवलिया अवतार आहेत. कोणत्याही तंत्रमंत्राचा, विधीचा उदो उदो ते करत नाहीत. जेथे सर्व मार्ग संपतात, तेथे गुरु मदतीला येतात. 

दत्त गुरूंचे स्वतःचे २४ गुरु आहेत. हे सर्व गुरु आहेत. 

पृथ्वी, पाणी, हवा, आग, आकाश, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, महासागर, पतंग, मधमाशी, मध गोळा करणारा, हत्ती, हरण, मासे, नृत्य करणारी मुलगी, पिंगळा, डोंबकावळा, लहान मूल, कुमारिका साप, बाण बनविणारा, कोळी आणि किडा.

रेखाटन: डॉ धनश्री बिडवाईक 

अश्या आणि अनेक गुरूकडून दत्त शिकले. निसर्ग हा आपला पहिला गुरु आहे, आजूबाजूला घडणारे प्रसंग दुसरा गुरु आहे. घडणाऱ्या घटना काहीतरी शिकवून जातात हाच संदेश दत्त गुरु देतात. 

स्वामी समर्थ असोत, नृसिंह असोत, शंकर महाराज, ह्या दत्त अवतारांची कधीच रेडिमेड उत्तरे दिली नाहीत. त्यांनी माणसाला आधी एखादे कर्म करण्याचा उद्देश आणि हेतू जाणून घ्यायला सांगितला.    

मनात भक्ती असेल तर नक्की अनुभूती येते. श्रद्धा महत्वाची. तुमचा विश्वास कदाचित असेलही पण श्रद्धा नसेल तर अनुभूती कठीण आहे. जेव्हा तुम्ही तुमचा मी पणा सोडून गुरूंना शरण जाता तेव्हा नकळत सर्व काही मोकळे होते. बरे गुरूंना शरण होण्यासाठी गंडेदोरे, विधिविधान आणि तंत्रमंत्राची गरज नाही. डोळे मिटून नामस्मरण केले की मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते.  मानसपूजा ह्या देवांना पुरेशी आहे. दत्तगुरु, स्वामी अशी फक्त हाक दिली तर मनोकामना पूर्ण होतात. फक्त ती हाक हृदयापासून यायला हवी. मनात आतुरता हवी. 

दत्त गुरु, स्वामी, आणि श्रीपाद श्रीवल्लभ हे पुजण्याचे देव नाहीत तर मानण्याचे आहेत. ते देव आणि अवलिया महापुरुष म्हणून महान आहेत पण त्याचबरोबर मार्ग दाखवणारे गुरु आहेत.

दत्तसंप्रदाय हा महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. तळागाळातील लोक दत्तगुरूंचे भक्त आहेत. हजारो लोक स्वामी समर्थांच्या मठात जातात. कोठेही बाजारूपण नाही, बडेजाव नाही. ह्या जागी सर्वजण एकत्र येतात. ओठावर दत्ताचे आणि समर्थाचे नामस्मरण तेवढे असते. पण सर्वाना गुरूंची प्रचिती येते. 

खऱ्या अर्थाने दत्तगुरु आध्यात्मिक विकासाचा मार्ग दाखवतात. हे करत असताना प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करतात. दत्ताच्या प्रत्येक लीलांमधून कोणतातरी संदेश आहे. चमत्कार समजून ते वाचले तर हातात काहीच पडणार नाही, पण त्यामागचा अर्थ समजून घेतला की मग सर्व सोपे आहे. 

प्रत्येक गोष्ट विधात्यापासून सुरु होते आणि तेथेच संपते. ह्या दोन बिंदूंमधला प्रवास म्हणजे जीवन. हा प्रवास सुकर करण्याचे माध्यम म्हणजे गुरु...त्याला तुम्ही कोणत्याही नावाने हाक मारली तरी तो एकच, दत्त गुरु, स्वामी समर्थ, श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती.

विनोद बिडवाईक 


(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)  

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

सती सावित्री

दोन तीन दिवसापासून गावातील वातावरण एकदम उत्साही झाले होते. घरातील मोठी माणसे आणि लहान मुले, आबालवृद्ध, धनिकांच्या घरी काम करणारे गडी सर्वजण आनंदात होते. प्रत्येकजण उत्साहाने एकमेकाला विचारात होते कि "तू येणार ना?". शाळेमध्ये तीच चर्चा होती. मधल्या सुट्टीत गप्पांचा विषय तोच होता आणि तेथेही सर्वजण एकमेकाला विचारात होते, "तू येणार ना?" किती वाजता जायचे, कोठे बसायचे, समोरची जागा पकडायची कि मागची, अश्या प्रकारच्या चर्चेचे गावात उधाण आले होते. घरातील सुनांना कधीतरी बाहेर पडायची संधी मिळणार होती म्हणून त्या पण खुश होत्या. एकंदरीत उत्साहाचे भरते आले होते.

आमच्या गावात देशमुखांचा जवाहर साऊंड सिस्टम भाड्याने देण्याचा व्यवसाय करत असे. म्हणजे त्याचा खरा उद्योग गावातील पारावर मित्रांना गोळा करून पत्ते खेळण्याचा होता. कधीकधी जवाहर आणि त्याचे मित्रलोक चौसर पण खेळत असत. त्यातून वेळ मिळाला की बापाशी भांडायचे आणि त्यातूनही  वेळ मिळाला कि मग शेतात काम करायचे आणि पूरक उद्योग म्हणून साऊंड सिस्टम भाड्याने देण्याचे काम करायचे. असे उद्योग जवाहर करत असे. साऊंड सिस्टम मध्ये दोन भोंगे, एक अँप्लिफायर, एकदोन माईक, काही तबकड्या आणि कॅसेट असायच्या. गावातील गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेश्या होत्या.

एक दिवस जवाहर आमच्या गावापासून २५ किलोमीटर दूर असणाऱ्या परतवाडा नावाच्या शहरात गेला. कोणीतरी त्याला, गावात तंबू लावून चित्रपट दाखवण्याचा धंधा करण्याचा सल्ला दिला. परतवड्यात असे तंबू लावून चित्रपट जोरात चालत असत. ते पाहण्यासाठी गावातील मंडळी कधीकधी जात असत. ह्या तंबूतील चित्रपटांना टुरिंग टॉकीज म्हणत असत. अर्थात त्यापैकीच एकाने जवाहरची मदत घेण्याचे ठरवले. सर्व व्यवस्था तो मालक करणार, गावातील विजेची, मैदानाची, आणि लोकांना घेऊन येण्याची व्यवस्था तेवढी जवाहरने करायची अशी ही भागीदारी होती.

ही व्यवस्था पूर्ण करण्याच्या आधी जवाहरने गावातील बऱ्याच लोकांच्या घरी जाऊन त्यांची मते घेतली होती. थोडक्यात हा एक मार्केट सर्वेच म्हणावा लागेल आणि ह्याच आधारावर गावांमध्ये टुरिंग टॉकीज ला चांगले दिवस आहेत या निष्कर्षाप्रत जवाहर आला होता. 

आणि एक दिवस जवाहरने त्याच्या साऊंड सिस्टिम चा उपयोग पहिल्यांदा स्वतःसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या आवाजात त्याने टुरिंग टॉकीजची प्रसिद्धी करायला सुरुवात केली. येत्या रविवारी गावात "सती सावित्री" हा चित्रपट या टुरिंग टॉकीजमध्ये दाखवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. खरं तर हे जाहिरातीचे तंत्र पूर्णपणे यशस्वी झाले होते. गावांमध्ये टुरिंग टॉकीज आणि त्यातही पहिला चित्रपट सती सावित्री. त्यामुळे गावातील प्रत्येक जण या बातमीने उत्साहीत झाला होता. थोडक्यात काय तर मनोरंजनाचे असे नवीन साधन आता  गावांमध्ये उपलब्ध होणार होते. त्यावेळेस खरंतर कोणाच्या घरी टीव्ही नव्हते. एक दोन धनिक मंडळी होती, त्यांच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. रेडिओ आणि टीव्हीवरचे कार्यक्रम सुद्धा ठराविक वेळेस असायचे. त्यामुळे टुरिंग टॉकीजच्या प्रयोगाने गावातील वातावरण ढवळून निघाले नसते तरच नवल.

"सर्व गावकऱ्यांना कळविण्यात येत आहे की येत्या रविवारी दिनांक अमुक-अमुक दिवशी महान भव्य बोलपट सती सावित्री चा प्रयोग गावातील शाळेच्या मैदानावर आयोजित केलेला आहे. पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात येत असून सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत हा कार्यक्रम बघण्यासाठी जरूर यावे. प्रवेश फी फक्त दोन रुपये." आणि "आपल्या मृत पावलेल्या नवऱ्याला यमाच्या तावडीतून घेऊन येणाऱ्या, एका सती सावित्रीची ही कहाणी आपल्या डोळ्यात नक्कीच अश्रू आणेल. त्यामुळे हा धार्मिक बोलपट अवश्य बघावा, अशी गावातील आया-बहिणींना विनंती आहे. येत आहे, लवकरच येत आहे सतीसावित्री. प्रवेश तिकिटाचे दर फक्त दोन रुपये" ह्या आणि अश्या जाहिरातींनी जवाहरने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याच्या घराच्या छतावर दोन भोंगे लावून दिवसातून कमीत कमी दहा बारा वेळा हा जाहिरातीचा कार्यक्रम पार पडत असे. गावातील लहान मुलांना माईकवर बोलण्याची खूप हौस असायची. त्यामुळे या जाहिरातीचे काम गावातील लहान मुले सुद्धा इमानेइतबारे करू लागली.

शेवटी तो महत्त्वाचा दिवस उगवला. गाव तसे सुस्त असायचे. पण गावातील लगबग जरा जास्तच जाणवू लागली. आया-बहिणी आपापली कामं आटोपु लागली. रात्रीचा स्वयंपाक सकाळीच करून ठेवला गेला. शाळेला तर सुट्टी होती, त्यामुळे मुले जागोजागी उभे राहून चर्चा करू लागले. काही उत्साही लोकआणि उत्साही मुले उगाचच गावातील त्या ग्राउंड वर जाऊन टुरिंग टॉकीज म्हणजे काय असते हे बघून आले. इतर मुलांना माहिती देऊ लागले. परत त्यांना सोबत घेऊन जाऊ लागली. कुठून तरी विजेची व्यवस्था करण्यात आली होती. मोठा तंबू पडला होता. कमीत कमी दोनशे तीनशे लोक बसू शकतील असा तो मोठा तंबू होता. समोर एक मोठा पांढरा पण मळकट मोठा पडदा लावला होता. खरं तर तोपर्यंत माझ्या आयुष्यात मी कधीही चित्रपट बघितला नव्हता. चित्रपट नेमका कसा असतो हेही मला माहीत नव्हते. तो पडद्यावर दिसतो, तो कसा प्रोजेक्ट होतो, ते आवाज कुठून येतात हे मला काहीच माहीत नव्हते. त्यामुळे हा चित्रपट बघण्याची उत्सुकता मलाही होती. आमच्या घरी पण नेमके तेच वातावरण होते. अर्थात बोलपट म्हणजे काय, चित्रपट म्हणजे काय अश्याही चर्चा रंगू लागल्या. 

त्यावेळेस पिक्चर काय प्रकार असतो, तो कसा दिसतो, हा सर्व प्रकार मला नवीन होता. नाही, चित्रपट हा प्रकार त्या वेळेस नवीन नव्हता; परंतु विदर्भातील त्या खेडेगावातला तो नवीन होता.  खेडोपाडी फिरत चित्रपट दाखविणारे ते ‘मोबाईल थिएटर’गावात अवतरले. गावात अमाप उत्साह संचारला. खरंतर नेहमी शहरात जाणार्‍या मंडळीना चित्रपट हा प्रकार माहीत होता. परंतु 90 टक्के जनतेने आयुष्यात कधीही पिक्चर बघितला नव्हता. आम्ही सर्व काम सोडून थिएटरच्या तंबूकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. एक मोठा पडदा टांगण्यात आला होता. संपूर्ण मैदान पडद्याने बंदिस्त करण्यात आलं. लाकडी बाबूंचे कठडे बसवण्यात आले. आम्ही बच्चेमंडळी हा सर्व प्रकार कुतूहलाने बघत होतो. गावातील मोठी माणसं पाठीमागे हात बांधून हा प्रकार उत्सुकतेने बघत होती. संध्याकाळ झाली, लाऊडस्पीकरवर घोषणा होऊ लागली, "सुरू होत आहे, चालू होत आहे, महान धार्मिक बोलपट सती सावित्री, ठीक साडेआठ वाजता, सर्वांना विनंती आहे की वेळेवर या, आपापल्या जागी शांतपणे, बसा तिकिटाचा दर फक्त दोन रुपये.

तंबूमध्ये दोन भाग केले होते. एक भाग पुरुषांसाठी. एक महिलांसाठी. मोठ्या मुलांना पुरुषांच्या भागामध्ये बसविण्यात येत होते. हळूहळू गर्दी जमा होऊ लागली. वातावरणातील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता सती सावित्री हा चित्रपट सुरू होण्याची वेळ आली होती. साडेआठ वाजले. तंबूतील मोठे लाईट बंद करण्यात आले. अंधार झाला. मागून एक फोकस समोरच्या पडद्यावर पडला. काहीतरी काळपट पांढरट वेगात दिसू लागले. पंधरा-वीस मिनिटं हा फोकस अड्जस्ट करण्यात गेले. पडद्यावर शब्द आले, "समाप्त". अरे हे काय आहे. चित्रपट सुरु व्हायच्या आधीच समाप्त? लोकांनी थोडा आरडाओरड केली. 

आणि हे काय? यम आणि सावित्रीचा संवाद सुरु झाला. आणि यमाने सावित्रीला आशीर्वाद दिला. कोणीतरी ओरडले, "हे काय आहे? मधेच उलटेपालटे  सिन येत आहेत. सुरुवातीपासून सुरु करा." परत पडदा कोरा झाला. आता फक्त प्रकाश दिसू लागला. काही शब्द दिसले आणि प्रोजेक्टर बंद पडले. परत लोक ओरडू लागले. असा प्रकार २५-३० मिनटे सुरु होता. शेवटी पडद्यावर सिन सुरू झाले. सती सावित्रीची कहाणी दिसू लागली, तिचे कुटुंब, वगैरे.  आता चित्रपटाने गती घेतली होती. सावित्रीचा संघर्ष बघून बाया मुसमुसू लागल्या. सर्वजण चित्रपटात गुंतून गेले आणि अचानक मागून भांडण्याचा आवाज येऊ लागला. आमच्या गावातील बन्‍सी काळे नावाचा एक म्हातारा गृहस्थ भयानक दारू पीत असे. त्याने जोरात आरडाओरडा सुरू केला. तंबूचे कापड वर करून तो आत येण्याचा प्रयत्न करू लागला. जवाहर आणि इतर लोक त्याचे सहकारी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. "मी पैसे देणार नाही मला बोलपट बघायचा आहे" असे तो जोरजोरात ओरडू लागला. आता झटपट सुरु झाली. ह्या झटापटीत तंबूला लावलेला एक बांबू कोसळला. मागच्या बाजूने संपूर्ण तंबू खाली आला. सुदैवाने आम्ही बसलो होता त्या भागात तंबूचे बांबू सुस्थितीत होते. पण या प्रकाराने सगळीकडे गोंधळ माजला. लोक बाहेर पडायला लागले. काही जण उठून पडद्याकडे गेले. बन्सी काळे आता पुरता चवताळला आणि जवाहरच्या पार्टनर च्या अंगावर धावून गेला. जवाहर बाजूला झाला आणि माईक शोधू लागला. कोठेतरी प्रोजेक्टर च्या टेबल वर पडलेला माईक त्याने हातात घेतला आणि लोकांना शांततेचे आवाहन करू लागला. "बंधुनो आणि भगिनींनो, शांतता बाळगा." पण आता शांतता पाळण्याच्या परिस्थितीत कोणी दिसत नव्हते. एकाने जवाहरच्या हातातील माईक घेऊन फेकून दिला.  हे बघून पार्टनर ने बाहेर धूम ठोकली. बन्सी काळे त्याचा पाठलाग करू लागला.

चेंगराचेंगरीची परीस्थिती निर्माण झाली. लोक बाहेर पडू लागले. मी माझ्या आई आणि बहिणीसोबत होतो. बाबांना बाहेर पडताना त्यांनी आम्हाला आवाज दिला. भयानक गोंधळ माजला होता. थोड्या वेळाने संपूर्ण तंबू खाली कोसळला. लोकांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यांनी बांबू उखडले. पडदे फाडले. प्रोजेक्टर ची दशा काय झाली असेल देव जाणे. आम्ही गोंधळातच घरी आलो. सर्व लोक जवाहरच्या नावाने बोंब मारत होते. पुढचे पंधरा दिवस जवाहर गावाच्या बाहेर होता. 

सती सावित्री आपल्या नवऱ्याचा प्राण यमराजाकडून परत कसा आणते हे मात्र आम्हाला शेवटपर्यंत समजले नाही. दुसऱ्या दिवशी आईनेच आम्हाला सती सावित्रीची गोष्ट संपूर्णपणे सांगितली.   

मी "सती सावित्री" हा चित्रपट संपूर्ण बघू शकलो नसेल, मात्र त्याचा पाहिलेला काही भाग माझ्या आयुष्यातील पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या नोंदणीत निश्चितच ठेवावा लागेल.

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)  

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

मी न सांगितलेला किस्सा

मोठ्या माणसांच्या नावावर काही गोष्टी हमखास खपवल्या जातात. त्यांनी केलेल्या शाब्दिक कोट्या, विनोद आणि त्यांचे अनेक असे किस्से लोक आनंदाने वाचतात. मीही अश्या शाब्दिक कोट्या भरपूर करत असे. प्रासंगिक विनोद तयार करत असे. माझे वाचन तसे चांगले असे. माझी एक छोटी लायब्ररी होती. त्यात पाचसहा पुस्तके,काही मासिके आणि एकदोन कादंबऱ्या होत्या. कॅप्टन प्रताप नावाचे एक पुस्तक मला अतिशय आवडत होते. श्यामची आई हे दुसरे पुस्तक. शाळेत पण काही पुस्तके मिळत असत. अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन तसे भरपूर असे. वृत्तपत्रे गावात येत नसत, त्यामुळे त्यांचे वाचन फारसे होत नसे, रेडिओ वर बालचित्रवाणी, कामगार विश्व आणि असे बरेच कार्यक्रम आम्ही ऐकत असू. माझी समज तशी चांगली होती. त्यात आईला वाचण्याची भयानक आवड होती. ह्या सर्व प्रकारामुळे माझे भावविश्व समृद्ध होत गेले. माझे वडील बंधू मिलिटरी मध्ये होते, त्यानंतरचे दोन बंधू नाशिकला होते, एक भाऊ शहरात पब्लिक स्कूल मध्ये होता. हे सर्व जेव्हा सुटीत गावी येत असत तेव्हा काहीतरी वाचायला सोबत आणत असत. त्यांनी आणलेली पुस्तके, मासिके मग माझ्या वैयक्तिक वाचनालयात जमा होत असत.

त्यामुळेच माझी शब्दसंपदा वाढत गेली, मित्रांना मी काही वाचलेले किस्से सांगत असे, माझ्या भावांनी सांगितलेल्या गोष्टी, काही विनोद सांगत असे. कधी कधी मी स्वतः विनोद आणि किस्से तयार करून त्यांना सांगत असे. परंतु माझ्या नावावर मी न सांगितलेला किस्सा कोणीतरी खपवेल हे मात्र मला अपेक्षित नव्हते. सर्व कसे ओरिजिनल हवे ना? 

माझे वडील बंधू मिलिटरी मध्ये होते. दरवर्षी ते सुट्टीमध्ये गावी येत असत. गावातील ते एकटेच सैन्यात होते.  त्यामुळे गावात ते बऱ्यापैकी माहित होते. त्यांची पोस्टिंग भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात असे. परंतु ते कधीच आपला युनिफॉर्म घालून येत नसत. आमच्या गावातील काही जण पोलीस मध्ये होते आणि ते जेव्हा गावी येत तेव्हा युनिफॉर्म घालून येत असत. मी भाऊंना विचारात असे कि तुम्ही का युनिफॉर्म घालून येत नाही? त्यावर ते म्हणायचे, कि युनिफॉर्म फक्त ड्युटीवर असतानाच घालायचा असतो.

खरे तर त्यांनी युनिफॉर्म घालून गावात यावे, सर्वानी तो बघावा असे मला नेहमी वाटत असे. तेवढाच अभिमान. ते मग गावी आले कि मग काही किस्से सांगायचे. त्यांच्या कंमान्डींग ऑफिसर बद्दल सांगायचे. त्यांनी सांगितलेले किस्से मी मग मित्रांना सांगत असे. अर्थात त्यात बराच मसाला भरलेला असायचा. त्यांनी सांगितलेले छोटा किस्सा मी मोठा करून सांगत असे. बॉर्डरवरील चकमकी, शत्रूला नामोहरण कसे केले वगैरे वगैरे. युद्धकथा सर्वांनाच आवडतात. माझे बंधू हे रेडिओ आणि सिग्नल सांभाळत असत, त्यामुळे तसा त्यांचा लढण्याचा प्रत्यक्ष संबंध येत नसे. पण मित्रांना मिलिटरीमधील सर्व सारखेच! मित्रही मोठया उत्सुकतेने ते ऐकत असत. 

माझ्या गोष्टी ऐकून माझ्या एका वर्गमित्राला चेव येत असे. त्याचा भाऊ मुंबई ला होता. मग तो असे काही किस्से सांगत असे कि कितीही म्हटले तरी विश्वास बसत नसे. त्याचा भाऊ मुंबईतील एका बिल्डिंगमधल्या २०व्या मजल्यावरून उडी मारत असे, येणाऱ्या ट्रेन ला हाताने थांबवत असे किस्से ऐकून कोणाचा विश्वास बसेन? आम्ही लहान होतो, मूर्ख नाही.  

परंतु असा एक किस्सा माझ्या नावावर कोणीतरी असाच खपवला आणि संपूर्ण गावात त्या किस्स्याची चर्चा होत गेली. किस्स्यात कन्टेन्ट होते हे मान्य करावे लागेल. मनोजकुमारच्या एखाद्या युद्धावर आधारित सिनेमा मध्ये असा सिन खपून गेला असता. 

माझ्या नावावर खपवलेला किस्सा असा, “अचानक सैन्याला सीमेवर जाण्याचे आदेश देण्यात आले. सीमेवर जाणाऱ्या तुकडीत माझे वडील बंधू पण होते. सीमेवर जाण्यासाठी लढाऊ विमानाची सोय करण्यात आली होती. एका विमानात माझे बंधू होते. आता पुढे काय होईल हे माहित नव्हते. बरे आपण सीमेवर चाललो, हे पत्राने कळविणे शक्य नव्हते. त्यामुळे बंधूने विमानातचा पत्र लिहिले. विमानात असणाऱ्या पाकिटात ते टाकले. ते विमान आमच्या गावावरून घ्यायला सांगितले. इकडे गावात मी घराच्या बाहेर ओट्यावर बसलो होतो. गावावरून जात असताना, त्यांनी मला बघितले, आवाज दिला आणि लिहिलेली चिठ्ठी खाली टाकली. त्यावेळी नेमका वारा वाहत नव्हता, त्यामुळे ते पाकीट माझ्या आता पडले. मी त्यांना बघून सॅल्यूट केला, विमानाने वेग घेतला आणि बंधू निघून गेले. मी घरात गेलो आणि ते पत्र बाबाकडे सुपूर्द केले."   

हा किस्सा ऐकून आई -बाबा, बहीण आणि इतर मोठी माणसे हसत असत. पुढील एक वर्ष हा किस्सा संपूर्ण गावात चर्चेचा विषय होता. अर्थात हा किस्सा मी मुळीच बनवलेला नव्हता. माझ्या नावावर तो कोणी खपवला मला शेवटपर्यंत कळले नाही. माझ्या मित्रांनी मात्र ह्यावर विश्वास ठेवला. "त्यात काय एवढे, विमानातून असे पत्र खाली टाकणे शक्य आहे, त्यांनी टाकले असेल?" माझा खास मित्र विजय शिंदे लोकांना सांगत असे.

नंतर एक दिवस मला असे कळले कि हा किस्सा माझ्या गणेश नावाच्या एका मित्राने बनवला होता. आणि त्यानेच तो सर्वाना सांगितलं होता. गाव लहान असल्यामुळे वनव्यासारखा तो पसरला. मी जेव्हा त्याला हे विचारले, तेव्हा तो हसत म्हणाला. "मजा आली कि नाही? अशी घटना घडली अशी गोष्ट तू आम्हाला कधीतरी सांगणार आहेसच, त्यामुळे मीच ती आधी लोकांना सांगितली." मी त्याला कोपरापासून हात जोडले. 

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)