रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

समाजाचे तथाकथित समरस फॅब्रिक

समाजात वेगवेगळे प्रवाह वाहत असतात. हे प्रवाह समाजघटकांच्या वागणुकीवर आपला प्रभाव टाकत असतात. बदलत्या काळाप्रमाणे समाजातील जगण्याचे मापदंड ही बदलतात आणि ते बदलते हवेतही. परंतु सामाजिक अभिसरण होत असताना काही गोष्टी भावनिक होऊन जातात. प्रगतिशील समाजाची रचना बदलत्या मापदंडाच्या प्रभावी स्वीकृतीने होत असते. तसेच समाजात असणाऱ्या आदर्श व्यक्तींच्या वागण्यातून हि स्विकृती तळागाळात जाते. भूतकाळातील रूढी, काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. पण ते सहजपणे स्वीकारणे कठीण असते. अर्थात सर्वच गोष्टी सोडून द्यायच्या नसतात. सामाजिक व्यवस्था जेव्हा खूप कठोर होते, तेव्हा संघर्ष अटळ असतो.

आपले वर्तन कसे असावे, समाजात वावरताना काय करावे आणि करू नये ह्याचे काही नियम असतात आणि सरकारने ठरवलेले कायदे बंधनकारक असतात. आदर, सहयोग आणि सह-अनुभूती ह्या तीन पैलू मुळे प्रगती होत असते. समाजातील काही विशिष्ट घटक प्रगतिशील आहेत ह्याचे हेच कारण आहे.

पण जेव्हा काही विशिष्ट घटक समाजातील प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेतात, विशिष्ट घटकाला लज्जास्पद ठरवले जातेतेव्हा समाजातील रचना तुटायला सुरुवात होते. एखाद्या विशिष्ट घटकाने १०० वर्षांपूर्वी केलेल्या अन्यायामुळे  त्या समाजाला आजही जबाबदार ठरवावे हे मात्र चुकीचे आहे.

दुर्दैवाने भारतातील हे सामाजिक समरस फॅब्रिक आता हळूहळू उकलू लागले आहे. समाजातील काही ठेकेदारांनी आणि विशिष्ट विचारसरणीच्या समाजघटकांनी आतापर्यंत ह्या सामाजिक समरसतेला पद्धतशीरपणे सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले आहेत आणि अजूनही ते करत आहेत. एक विशीष्ट यंत्रणा ह्यामागे पडद्याआड काम करते आहे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे पण सामाजिक एकतेचा संदेश फक्त बहुसंख्य असणाऱ्या घटकांना लागू केल्या जातो. ह्या वर्गाला shaming करण्याचे प्रयत्न स्वातंत्र्यापासून सुरु आहेत. धर्म हा जगण्याचा मार्ग दाखवतो. धर्मातील आणि समाजातील काही विधी (rituals) हे सांकेतिक पण आधार देणारे असतातत्याचा आदर करायला हवा. दुर्दैवाने शिक्षण संस्था, कार्यकारी संस्था, विद्यापीठे, सगळेकडे तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली बुद्धिभेद चालवलेला आहे. लोकांच्या भावना भडकावून आपली पोळी भाजून घेण्यासाठी मग काहीतरी टूम काढायचे उदयोग सध्या सुरु आहेत.

भारताचा साक्षरतेचे प्रमाण ७७% असूनही , लोक अश्या प्रकारांना बळी पडतात हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. कदाचित लोक साक्षर झालेत पण नागरिक शिक्षण फक्त २० मार्कांचे असल्यामुळे, लोक सुसंकृत व्हायचे विसरले

खरे तर आता वेळ आली आहे तो प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी घेण्याची. राजकीय आणि तथाकथित विचारवंतांच्या नादी लागता, तार्किकदृष्ट्या विचार करण्याची. समाजातील प्रत्येक घटकांबद्दल आदराची भावना ठेवून, आदर, सहयोग आणि सह-अनुभूती (empathy) हे तीन स्तंभ मानून योग्य तो निर्णय घेण्याची. ह्या प्रक्रियेत काही घटकांना काहीतरी त्याग करावा लागेल, आपल्या स्वार्थी कोषातून बाहेर पडावे लागेल.

येणाऱ्या नवीन पिढीच्या हातात, एकसंध समाज देण्याचे मोठे आवाहन आपल्यापुढे आहे. ते आवाहन आपण कसे पार पाडतो हे येणारा  काळच ठरवेल.

विनोद बिडवाईक

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

गोवर्धन

तो माझा कोणीही लागत नव्हता. माझा नातेवाईक नाही, माझ्या जवळच्या मित्राचा नातलग नाही, की त्याची दखल घ्यावी असा कोणीही व्यक्ती नाही. तो एक यत्किंचित असा गरीब व्यक्ती होता. पण तो माझ्या मनातून अजूनही गेलेला नाही. त्याचा प्रभाव माझ्या आयुष्यावर पडण्याचा प्रश्‍नच नाही. इतकेच काय पण त्याला लक्षात ठेवण्याजोगे त्याचे फारसे कर्तृत्वही नाही. पण जेव्हा कधी मला माझे गाव व माझे बालपण आठवते तेव्हा तो मला हमखास आठवतो. आता कदाचित तो नसेनही. त्याच्या जाण्याने तसा कोणाला फरकही पडणार नाही म्हणा. पण माझ्या बालपणी तो प्रत्येक घराचा एक अविभाज्य घटक होता. कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येक घराचा संबंध त्याच्यासोबत येत असे.

त्याचे नाव होते गोवर्धन. त्याच्या आई-वडिलांनी त्याचे नाव एवढे भरभक्कम का ठेवले असावे, देव जाणे. गोवर्धन पर्वत श्रीकृष्णाने आपल्या करंगळीच्या साह्याने उचलून गोकुळवासीयांना तुफान पावसापासून आणि इंद्राच्या क्रोधापासून वाचवले होते; ही कथा आपण लहापणापासून ऐकलेली आहेच. तर अशा भक्कम पर्वताचे नाव धारण करणारी ही व्यक्ती अगदी यथातथाच होती.

गोवर्धन स्वभावाने अगदी गरीब होता. मागून कोणीही यावे आणि टपल्या मारून जावे, असा त्याचा स्वभाव होता. अठराविश्‍वे दारिद्य्र आणि दारिद्य्रामुळे झालेला स्वभाव. मला त्याच्याकडे बघूनच त्याची दया यायची. गोवर्धनचे लग्न तर झाले होतेच; पण त्याला दोन मुलेही होती. त्याची ती लहान लहान मुले, त्याची बायको आणि गोवर्धन कोणाच्या खिजगणतीत असण्याचा प्रश्‍नच नव्हता. काही दिवसांनंतर गोवर्धनची बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली दोन चिल्ली-पिल्ली गोवर्धनकडे सोडून.

परिस्थिती खूपच बिकट होती. दररोज मजुरी करायची आणि संध्याकाळी ज्वारी वगैरे आणून संसार चालवायचा, असा जीवनाचा प्रवास सुरू होता. एकच जमेची बाजू म्हणजे त्याला कशाचेही, अगदी तंबाखूचेही व्यसन नव्हते. गावातील लोकांसोबत त्याचा वागण्याचा स्वभाव अदबशीर होता. कोणाला काही बोलायचे नाही, कोणाच्या अध्यात ना मध्यात. ह्या माणसाकडे बघून निर्विकार आणि स्थितप्रज्ञ या दोन शब्दांचा अर्थ कोणालाही कळेल. चेहर्‍यावर ना कुठले दु:ख, ना आनंद. असा हा गोवर्धन.

कामाच्या बाबतीत मात्र हा गडी तुफान होता. गावातील प्रत्येक घरात कोणताही कार्यक्रम असला, की विहिरीतून पाणी काढून सर्व ड्रम्स भरून ठेवणे आणि पाण्याचा अभाव जाणवू न देणे हा त्याचा हातखंडा होता. आणि केवळ याच कारणामुळे गावातील प्रत्येक घरासोबत त्याचा संबंध होता. उन्हाळ्यातील लग्नांमध्ये गोवर्धन असायलाच हवा. बरं तो त्या पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील नारायणसारखा मधे मधे करणारा वल्ली मात्र नव्हता. आमच्या गावातील सधन मंडळी काहीतरी निमित्ताने धार्मिक कार्यक्रम वगैरे ठेवून जेवण्याच्या पंगती देत असत. अशा वेळेसही गोवर्धन कामाचा असायचा. विहिरीला पाणी नसेल, तर नदीवरून पाणी आणायचे. मी गोवर्धनला पाणी भरण्याव्यतिरिक्त वेगळे कोणते काम अशा उत्सवात/लग्नात अथवा कार्यक्रमात केलेले कधीही बघितले नाही.

मी शाळेत जाताना त्याच्या झोपडीवजा घरासमोरून रोज जायचो. छप्पर तुटलेले, मातीच्या भिंती तुटायच्या मार्गावर, घरात फक्त पाच-सहा अ‍ॅल्युमिनियमची भांडी, बाजूला काही गोधड्या. रोज सकाळी गोवर्धन आणि त्याची तीन-चार वर्षाची मुले चुलीजवळ बसून काहीतरी बनवत असायची. मोठ्या आशाळभूत नजरेने ती दोन मुले काहीतरी खायला मिळेल याची वाट बघत असायचे. हे दृश्य बघून मला खूपदा दुपारचे जेवण घ्यायची इच्छा होत नसे. ते सर्व दृश्य मला गलबलून टाकत असे. आईला सांगून घरातील भाकरी-भाजी घेऊन मी बर्‍याचदा गोवर्धनच्या मुलांना द्यायचो.

दहावीनंतर मी गाव सोडले. पुढे गावी जाणेही दुर्मीळ झाले. गोवर्धनचे पुढे काय झाले ते माहीत नाही. त्याची मुले मोठी झाली असतील आणि ते पण आता कदाचित छोटी-मोठी कामे करत असतील.

गोवर्धन आता नसेलही, पण मला रोज असे गोवर्धन दिसतात. कधी बांधकामाच्या साईटवर, तर कधी रस्त्यावर असेच फिरत, निर्विकार चेहरा ठेवून वावरणारे...

विनोद बिडवाईक

गरिबीचा गवगवा

प्रत्येक कथा, गोष्टी, किस्से, वाचले तर असे लक्षात येते की, आपल्याला गरिबीचे ग्लोरिफिकेशन करायला खूप आवडते, असे करत असताना प्रत्येकाचे पैसे कमवायचे आणि श्रीमंत होण्याचे स्वप्न मात्र निश्चितच असते. लाखो करोडो कमावणारे सतत दुःखात असतात, त्यांना भयानक तणाव असतात, त्यांचे मित्र कमी असतात, त्यांना कोणी विचारात नाही, ते एकाकी असतात, ते भ्रष्ट असतात, त्यांचे नातेवाईक त्यांच्या जवळ नसतात वगैरे वगैरे सारखे गैरसमज पसरवत असतो. गरिबीत लोक  सुखात असतात, त्याचे तणाव कमी असतात, त्यांना भरपूर मित्र असतात. नातेवाईकांसोबत त्यांचे चांगले संबंध असतात असाही आपला गैरसमज असतो. 

हे सर्व करत असताना आपण विसरतो की लोकांनी गरिबीत राहावे हेच सांगत असतो, प्रत्यक्षात गरिबी कोणालाच नको असते. आपण श्रीमंत लोक श्रीमंत का व कसे झालेत हे सांगत नाहीत.    

समाधान, आनंद, हे व्यक्तिसापेक्ष असते. त्यात गरिबी आणि श्रीमंतीचा काहीही संबंध नसतो. 

गरिबी मुळीच वाईट नाही, माणूस समाधानी असेल तर गरीब स्वतःचे आयुष्य गरिबीत काढू शकतो, आणि श्रीमंतीही वाईट नाही, पण श्रीमंत समाधानी नसेल तर पैसे असूनही तो दुःखी असू शकतो. 

मुळात कित्येक श्रीमंत आणि उच्चमध्यमवर्गीय लोक अगदी सुखात आणि आनंदात आहेत आणि कित्येक गरीब लोक आणि मध्यमवर्गीय लोक दुःखात आहेत. तसेच कित्येक गरीब लोक अगदी आनंदात आहेत आणि श्रीमंत लोक दुःखात आहेत.

मुळात आपण ह्या ग्लोरिफिकेशन च्या नावाखाली स्वतःचे अपयश, लपवत असतो, किंवा आपला एखाद्या अनुभवावर आपण आपले विशिष्ट वर्गीय बद्दल समज बनवत असतो. आपल्यात असेही समज आहेत की शहरात राहणारे, चांगल्या कंपनीत काम करणारे दररोज पिझ्झा खातात, पार्ट्या करतात आणि भाजीवाल्याशी भाजी घेताना कटकट करतात. हे सांगत असताना आपण ह्याच लोकांमुळे, त्यांची स्पेंडिंग पॉवर असल्यामुळे आपली दुकाने चालतात, आणि हेच लोक गरज असतात मदत करतात, तसेच ह्या लोकांनी भरलेल्या टॅक्स मुळे आपल्याला सरकारचे बेनिफिट्स मिळतात हे सोईस्कर पणे विसरतो.

श्रीमंत होणे वाईट आहे हेच आपण ऐकत आलो आहोत.  लोंकाना गरिबीत ठेवणे हे राजकीय लोकांचे एक साधन आहे. पण हे करत असताना दुसरी  बाजू नेहमी कमी लेखावी लागते. त्यासाठी एक विशिष्ट वर्गाला लज्जास्पद (shaming ) करावे लागते. त्या वर्गाकडून सर्व काही घ्यायचे आणि बोलताना दुसरी बाजू घ्यायची हा दुट्टपीपणा काही लोकांच्या रक्तात भिनला आहे.   

गरिबी आणि श्रीमंती ही मानसिक स्थिती आहे. सर्वजण श्रीमंत होऊ शकत नाहीत, पण आपली स्वतःची प्रगती करण्याची प्रत्येकाकडे क्षमता असते. प्रश्न आहे ती क्षमता वापरण्याची. ग्लोरिफाय करायचेच असेल तर, गरीब व्यक्ती मधील श्रीमंतीला आणि शेमिंग करायचंच असेल तर श्रीमंत व्यक्तीतील दारिद्र्याला करायला हवे.    


विनोद बिडवाईक


शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

पेन

रात्रीचे आठ वाजले असावेत. वातावरणात एक भयाण शांतता होती. रातकीड्यांचा आवाज तेवढा ऐकू येतो होता. मध्येच एखादी बैलगाडी जात होती. दूरच्या रस्त्यावरून बैलाच्या गळ्यात असणार्‍या घंटीचा आवाज मधेमधे कानाला जाणवत होता. आकाशातील अर्धचंद्राचे प्रतिबिंब तेवढे नदीच्या पात्रात दिसते होते. पाण्यातील मासे जसे हालचाल करीत तसा थोडाफार तरंग तयार होता होता. दूरवर कौलारू घरांमधून चुलीतून येणारे धूर आता दिसू लागला होता. काही दिवे मिणमिणताना दिसत होते.

जवळपास एक तासापासून गावाच्या बाहेर नदीच्या काठावर मी एकटाच बसलो होतो. वेळही जात नव्हता आणि माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. माझ्यावर घरातील कोणीच प्रेम करीत नाही, याची मला आता खात्री पटली होती. एकंदर थोडाफार जरी घरी जायला उशीर झाला, तर काळजीत पडणारे माझे आई-वडील आज मला शोधायला आले नव्हते.

आता हळूहळू माझ्या पोटात भूक चाळवू लागली होती. मला माझ्या मोठ्या ताईची खूप आठवण येऊ लागली. सहा महिन्यांपूर्वीच तिचे लग्न होऊन ती सासरी गेली होती. ती आज जर घरी असती, तर नक्कीच ती मला शोधायला आली असती. तिचे होतेच माझ्यावर खूप प्रेम.

काय करावे ते सूचत नव्हते. आता कोणाचीही वाट न बघता आपण घरी जावे का, हा विचार मी करू लागलो. पण मोठ्या धैर्याने आईवर रागावून मी घर सोडून निघालो होतो. तसाच परत घरी गेलो असतो, तर माझा ‘इगो’ भयानक हर्ट झाला असता. जसा जसा वेळ जात होता, तसा तसा माझा संयम सुटत जात होता. त्यात भुकेने कासावीस व्हायला लागले होते. आता काय करावे, या विचाराने मला रडायला येऊ लागले. मनात विचार आला, चला घरी जाऊ. आईने जेवण बनवले असेल तर खाऊ आणि परत बाहेर पडू.

आता भुकेसोबत भीतीपण वाटायला लागली होती. आपण घराबाहेर पडून चूक केली, या निष्कर्षाप्रत मी आलो. 


त्याचे झाले असे, की शाळेतून घरी आल्यानंतर मी आईला पेन घेण्यासाठी तगादा लावला होता. माझ्याकडे एक शाईचा पेन होता. आणि त्या पेनाची निब आता झिजायला आली होती. तशी त्यातून शाईसुद्धा बाहेर यायला लागली होती. माझ्या काही मित्रांकडे छानसे पेन होते. ते पाहून आपल्याकडे पण आता नवीन पेन असायलाच हवा, असे वाटू लागले होते. आईचे म्हणणे होते, की निब बदलून या पेनवर अजून काही दिवस चालव. आपण पुढच्या महिन्यात घेऊ नवीन पेन. पण मला लगेचच पेन हवा होता. अर्थात, त्या पेनावर काही दिवस ढकलता आले असते. पण मी हट्टावर अडून राहिलो. शब्दाला शब्द वाढत गेला. मला भयंकर राग आला आणि मी बोलून गेलो, ‘तू मला पेन दिला नाही, तर मी घर सोडून निघून जाईन.’ रागाच्या भरात आईपण बोलली, ‘जा, कुठे जायचेय तिकडे जा. ह्या वयात तुझे हे असले थेर मी सहन करणार नाही.’ आणि मी थेट घराच्या बाहेर पडलो.

थोड्या वेळाने विनू, विनू म्हणून वडिलांच्या हाका ऐकू येऊ लागल्या. मी जास्त आढेवेढे न घेता वडिलांकडे धाव घेतली. वडिलांनी पहिल्यांदा माझ्याकडे रागाने बघितले. पण नंतर माझा चेहरा बघून त्यांचा राग मावळला.

‘चल, पेन घेऊन देतो.’ म्हणून नदीच्या पलीकडे असलेल्या बाजारपेठेत ते घेऊन गेले.

घरी आल्या आल्या मी आईच्या कुशीत शिरलो. ती रागावली होती. मला समजवण्याच्या सुरात ती म्हणाली, ‘काही गोष्टी एवढ्या ताणायच्या नसतात. मी पेन देणार होतेच ना? नाही दिला म्हणून थेट घर सोडून जाणे म्हणजे खूप झाले. मला खूप वाईट वाटले.’

‘माफ कर आई,’ म्हणून मी डोळे पुसले आणि अभ्यासाला बसलो.

आज माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची अनेक पेन्स आहेत. गरज असो वा नसो, दुकानात गेलो, कधी छानसा पेन दिसला की तो घ्यायच्या मोह आवरत नाही. नवीन पेन घेतांना, लहानपणीची ती आठवण, ते घराबाहेर पडणे आणि वडिलांचे ते पेन घेऊन देणे मला अजूनही आठवते. घरातून बाहेर पडून मिळवलेल्या त्या पेनची सर आता मात्र  कोणत्याही पेनला नाही. 

- विनोद बिडवाईक