रविवार, २५ एप्रिल, २०२१

रँडम ग्रेड

शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांची मोठी सभा भरली होती. काही जण डबल बार वर बसले होते, काही जण खाली, काही जण जवळच्या पारावर. हे सर्व विद्यार्थी आठवी आणि नववीचे होते. विषय गंभीर होता. प्रत्येक जण तावातावाने बोलत होता, आपल्यावर अन्याय झाला असे त्यांना वाटत होते. ह्या विद्यार्थ्यांत काही विद्यार्थी असेही होते की ते मनापासून ह्या सभेत सहभागी झाले नव्हते. परंतु काही विद्यार्थ्यांनी भावनिक आवाहनाद्वारे, अर्थात भीती दाखवून सर्वाना एकत्र आणले होते. उद्या तुमचे काही प्रश्न निर्माण झाले, कोणी तुम्हाला मारले, तर आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुम्हाला मदत करणार नाही असे ते भावनिक आवाहन होते.

विषय पिटी कम स्पोर्टच्या सोनार सरांनी दिलेल्या ग्रेड चा होता. सोनार सर, असे काही बाही करत असत. ते बऱ्याचदा शाळेत येत नसत. मद्यप्राशन हे त्यांचे आवडीचे पेय होते आणि शिट्टीच्या दोरीने पायावर फटके मारणे हा त्यांचा छंद. शिट्टीच्या दोरीचा कंटाळा आला तर ते कधी कधी कंपाउंडच्याजवळ असणाऱ्या झाडाचे हिरवे फोक वापरत असत. तेव्हा ते पायांपेक्षा, पाठीवरच जास्त पडत असत. अर्थात त्याच्याजवळ हुशार, मठ्ठ, गरीब, श्रीमंत, जातपात असा काही भेदभाव नसे. त्यांच्यासमोर जो असेल आणि हातात जो येईल, त्यांच्यावर ते आपली कृपा करत असत. 

तर ह्या सोनार सरांनी आठवी आणि नववीच्या सर्व मुलांना सहामाही मध्ये ज्या ग्रेड दिल्या होत्या त्या खेळातील, इतर मैदानी उपक्रमातील आणि एक्सट्रा कॅरिक्युलर कार्यानुभवाच्या कामगिरीचा, विध्यार्थ्यानी घेतलेल्या प्रयत्नांचा विचार न करता, कामगिरीचा कोणताही निकश न लावता, रॅन्डमली, ग्रेडस दिल्या होत्या. 

अर्थात आतापर्यंत आम्ही ह्या ग्रेड कडे कधीच लक्ष दिले नव्हते. विद्यार्थी याबाबत सरांवर विश्वास ठेवत असत. स्पोर्ट्स आणि कार्यानुभव मध्ये कोणतीही ग्रेड मिळाली की त्याचे सुख दुःख नसायचे. त्यामुळे आताच हा विषय का तापला? 

त्याचे झाले असे की सोनार सर ज्या घरात भाडयाने राहायचे, ते घर राजेश तनपुरे ह्याच्या काकाचे होते. एका संध्याकाळी, सोनार सर नुकतेच गावाच्या बाहेर असणाऱ्या बाबू तावडेच्या खुल्या आवारातील गावठी मदिरालयात जाऊन आले होते. घराच्या बाहेरील ओट्यावर ते बसले होते. अर्थात त्यांची मस्त तंद्री लागली होती. घेतलेल्या स्पिरिट ने त्यांना स्पिरिच्युअल उंचीवर नेवून ठेवले होते. राजेश तेथेच होता. 

 "काय सर, मजेत ना." राजेश ने विचारले,

"हे तू मला काय विचारतोस? मी तर मजेतच असतो, तू काय करतोस? सहामाहीच निकाल कसा आला तुझा?" त्यांनी हसत विचारले.

"काय सर, माझा निकाल असा काय सांगण्यासारखा असतो का? पण एक प्रश्न आहे," राजेश,

"हं, विचार,"

"स्पोर्ट्स आणि कार्यानुभव ह्या रकान्यात "D" असे लिहिले आहे. असे का? मी तर शाळेचा कब्बडीच्या टीम चा कॅप्टन आहे." राजेश ने विचारले. 

"ते तसेच असते, मी कोणाला काहीही ग्रेड देतो. रॅन्डमली," ते हसत उत्तरले,

" रॅन्डमली? पण का?" राजेश ने थोडे रागावून विचारले. 

"To teach you students that life is unfair." ते एक तत्ववेत्त्याच्या आवेशात बोलले.  "आयुष्य हे कठीण आहे बाळा. तुला जे योग्य वाटते ते दुसऱ्याला अयोग्य वाटू शकते आणि तुला जे अयोग्य वाटते ते योग्य." 

"पण का?" राजेश वैतागत बोलला.  

"तू योग्य असला तरी कोणीतरी तुला अयोग्य दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि अयोग्य व्यक्तीला योग्य. नियती नेहमीच न्याय्य असते असे नाही." सरांची वाणी आता अमृतरस पाझरू लागली होती. 

"ती नियती गेली खड्ड्यात, ग्रेड काय असे रॅन्डमली देतात का कधी? ते जावू द्या, तुम्ही हे बदलून देणार का नाही?" राजेश आता रागावला होता. 

"नियती कधीही बदलत नसते." आतून बायकोने जेवायला या, असा आवाज दिला म्हणून सर घराच्या आत गेले. 

राजेश चडफडत घरी गेला. त्याने ठरवले की, रॅन्डमली ग्रेड देणे अन्याकारक आहे आणि आपण आवाज उठवलाच पाहिजे. सरांच्या ह्या रँडम फॉर्मुल्यामुळे मात्र काही विद्यार्थीचा फायदाही झाला. स्पोर्ट्स मध्ये यथातथा असणाऱ्या विद्यार्थीना चांगली ग्रेड मिळाली होती.   

सरांचा रँडम फॉर्मुला सगळीकडे पसरला. ही बातमी ऐकून मग प्रत्येकाने आपले गुणपत्रक तपासून बघितले. सरांच्या विरुद्ध आता जनमत तयार होऊ लागले. एके दिवशी शाळा सुटल्यावर सभेचे आयोजन निर्णय आले. 

राजेश ने आवेशपूर्ण भाषण दिले, सर्व माहिती विद्यार्थीना दिली. शेवटी त्याने सरांच्या निषेधाची घोषणा दिली. 

"सोनार सरांचा...' ह्या घोषणेवर काहीजणांनी "निषेध असो, तर काहीजणांनी विजय असो" असा प्रतिसाद दिला. कदाचित ज्यांना A, B ग्रेड मिळाल्या त्यांनीच विजयाच्या घोषणा मुद्दामून दिल्या असाव्यात.

दुसऱ्यादिवशी काही विद्यार्थी सोनार सरांकडे गेले. त्यांना ग्रेड परत तपासून देण्याची विनंती केली. त्यांनी ती नेहमीप्रमाणे धुडकावून दिली. शेवटी सर्वजण मुख्याध्यापकांना साकडे घालायला गेले. त्यांनी सर्वाना ऐकून घेतले आणि ह्यावर योग्य तोडगा काढण्याची ग्वाही दिली.

कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली ही बातमी प्रसिद्ध झाली; विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निर्णय घेण्यात येईल असेही सांगण्यात आले. ह्या प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर मन लावून अभ्यास, तयारी केली असेल, त्याच्या मनात काय द्वंद असेल हे आपल्याला खरंच माहित नाही.

सरांनी आम्हाला "Life is unfair" चा धडा नक्की दिला. परंतु ह्या विध्यार्थ्यांना सोनार सरांसारखे रँडम ग्रेड देणारे शिक्षक न भेटो हीच शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा