मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

दिवाळीच्या शुभेच्छा!

 दिवाळीच्या शुभेच्छा!

प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येला परतले. १२ वर्षाचे तप संपवून पहिल्यांदा प्रभू रामचंद्र सीतामाता, लक्ष्मण आणि पवनसुत हनुमानासोबत जेव्हा अयोध्येत आले, तेव्हा अयोध्यावासी जनतेने त्यांचे दिवाळी साजरी करून स्वागत केले. तेव्हापासून हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. 

दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि प्रेरणेचा सण आहे. जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याचा हा उत्सव आहे. भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. हंगामाच्या शेवटी, लोकांना कुटुंब आणि मित्रांसाठी नवीन कपडे, भेटवस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करण्यासाठी पैसे मिळालेले असतात.  कार, ​​बाईक, दागिने आणि घरे यासारख्या मोठ्या वस्तू खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधीही त्यांना मिळते. त्यामुळे दिवाळी साजरी करणे, अर्थव्यवस्थेला गती देणे, इतरांच्या जीवनात काही बदल घडवून आणणे हा मोठा उद्देश हा सण साजरा करण्याचा आहे. दिवाळी हे जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींतील यश साजरे करण्याचे रूपकही आहे. श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वच दिवाळीचा आनंद लुटतात. दिवाळीत प्रत्येकाच्या डोळ्यात एक प्रकारचे स्वप्न आणि मनात उत्साह असतो. लहान मातीचे दिवे, आकाशकंदील आणि निरनिराळ्या सजावटीच्या वस्तूंनी आपली घरे सजवली जातात. फराळाची, गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. फटाके आणि रोषणाई करून हा सण उत्साहाने साजरा केल्या जातो. 
धनश्रीने बनवलेला इको फ्रेंडली आकाशकंदील

या दिवसात लोक कुटुंबासाठी वेळ काढतात, एकत्र येतात आणि मजा करतात. दिवाळीचा उद्देश आत्मज्ञानाचा  प्रकाश पसरवण्यात आहे. दिवाळी आपल्याला शत्रुत्वाचा मार्ग सोडून मैत्रीचा अवलंब करण्यास शिकवते. शहरी जीवनाच्या गजबजाटात, ही एक वेळ आहे जेव्हा लोक एकत्र काही दर्जेदार वेळ घालवण्यासाठी एकत्र येतात.

दिवाळी म्हणजे अंतर्मुख होण्याचा आणि आपल्या अंतःकरणात आणि मनात ज्ञान आणि सत्याचे दिवे प्रज्वलित करण्याचा उत्सव आहे. आपल्या मनातील अंधार आणि अज्ञानाच्या शक्तींना दूर करण्याचा समारंभ आहे. हे करत असताना, इतरांना चांगुलपणाला प्रकाश देण्याचा उद्देश आहे. देवी लक्ष्मी, संपन्नेतची देवता आहे. दिवाळीच्या काळात आपण लक्ष्मीमातेला संपन्नता, करुणा, क्षमा आणि प्रेम-दया यासारख्या आध्यात्मिक संपत्ती (समृद्धीसह) जोपासण्यासाठीचा आशीर्वाद मागतो.  

गेल्या वर्षभरातील आपले विचार, शब्द आणि कृती यावर चिंतन आणि मूल्यमापन करण्याची ही वेळ आहे. आपले पूर्वग्रह, नकारात्मक वागणूक आणि वाईट सवयी मान्य करण्याची आणि चांगल्या प्रकारे समजून घेण्याची ही वेळ आहे, जेणेकरून आपण स्वतःला बदलण्याची प्रक्रिया सुरू करू शकू. आपण स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल अधिक प्रेमळ, दयाळू, आदरणीय कसे होऊ शकतो हे शोधण्याची ही वेळ आहे. सर्व संपत्ती, मग ती भौतिक असो वा आध्यात्मिक, कमनशिबी लोकांसोबत शेअर केली करण्याची बुद्धीही लक्ष्मीमाता देते.  

या वर्षी, आपण कोरोनाशी लढत आहोत. ही महामारी आपल्या सर्वांसाठीच एक मोठी शिकवण आहे. कोविड 19 पासून संरक्षण करण्यासाठी आरोग्य आणि सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची आणि काळजी घेण्याची ही वेळ आहे. आता वेळ आली आहे, ती परत बाउन्सबँक होण्याची. 

दीपोत्सवाच्या या शुभ सणाच्या दिवशी, आपले जीवन आनंदी, समृद्ध आणि आरोग्यदायी जावो ह्या शुभेच्छा.


विनोद, धनश्री आणि अथर्व बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन आणि पोथी.कॉम वर प्रिंटेड कॉपीज  उपलब्ध आहेत.) 


रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

माझे गुरु

माझी शाळा ही माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. माझी जडणघडण झाली ती माझ्या शाळेत. तुळशीरामजी मडके विद्यालय आणि त्याआधीची जिल्हा परिषद शाळा माझ्या अजूनही आठवणीत आहेत. त्यांचा चेहरामोहरा बदलला असेल. मी सुदैवी आहे असे म्हणावे लागेल कि मला चांगले शिक्षक मिळाले. मी शाळेत हुशार होतो. दरवर्षी पहिला नंबर कधी सोडला नाही. पण सर्वात महत्वाचे म्हणजे माझे शिक्षक, ते खऱ्या अर्थाने गुरु होते. चौथी आणि सातवी मध्ये मी स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्या होत्या आणि चांगल्या नंबरने त्या परीक्षांमध्ये उत्तीर्णही झालो होतो. त्यावेळेचे शिक्षक खरंच निरपेक्ष भावनेने काम करीत असताना, परिस्थिती तशी कोणाचीही चांगली नसायची. कित्येक शिक्षकांच्या घरची मंडळी शेतामध्ये पेरणी अथवा पीक काढावयाच्या वेळेस दुसऱ्यांच्या शेतात काम करायची. त्याची कोणालाही लाज वाटत नसे. मला वाटते त्या वेळच्या शिक्षकांवर जरा जास्तच अन्याय झाला असावा. 

चौथीपर्यंत आमच्या प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक होते बोबडे सर. त्यांची मुले आणि आम्ही एकत्र शिकलो. कशाचीही अपेक्षा न करता बोबडे गुरुजींनी माझी स्कॉलरशिप ची तयारी करून घेतली. रोज संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत कोणतीही फी न घेता गुरुजींनी आम्हाला शिकवले. त्यांचा सर्वात मोठा मुलगा आता मोठ्या पदावर आहे. पण दुर्दैवाने इतर तीन मुले फार शिकलेले नाहीत. गुरुजी मुख्याध्यापक तर होतेच पण गावातील पोस्टाचे पोस्टमास्तरही होते, त्यामुळे गावातील प्रत्येक घरांसोबत त्यांचा या ना त्या कारणाने संबंध यायचा. पांढरा सदरा, पांढरा पायजमा आणि खांद्यावर पांढरे उपरणे असा त्यांचा पेहराव असायचा. गावातील प्रत्येक मुलगा त्यांच्या तालमीतून पुढे गेलेला आहे. 

माझ्याकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. त्यामुळे शाळेत मला फारशा उचापति करता येत नसे. त्यांचा सर्वात लहान मुलगा आणि मी एकाच वर्गात होतो. आमची दोघांची छान मैत्री होती, पण आमच्यात कधी कधी भांडणेही झालेली आहेत. गुरुजी त्यांच्या घरी नेहमी माझे नाव काढायचे, माझे उदाहरण द्यायचे, म्हणून त्याचा माझ्यावर विशेष राग असायचा.

मी चौथीतुन पुढे हायस्कूलमध्ये गेलो. गजाननही माझ्या सोबत होता. पुढे गुरुजींनी कुटुंबियांसोबत गाव सोडले. त्यानंतर माझा त्यांचा संबंध संपला, पण बोबडे गुरुजी अजूनही मला आठवतात. दुपारी शाळेमध्ये सर्व शिक्षक स्वतःसाठी चहा बनवायचे, त्यासाठी दूध आणायला ते कोणाला तरी पाठवत असत. तसेच गावातील प्रत्येक मुलांनी शिकून पुढे जावे अशी त्यांची तळमळ असायची, पण दुर्दैवाने गावातील वातावरण पोषक असे नव्हतेच. शिवाय गुरुजी किती प्रयत्न करणार? बोबडे गुरुजी सारखे शिक्षक मला नाही वाटत आता असतील.

आमचे वर्गशिक्षक होते खाटकडे गुरुजी. ते दुसऱ्या गावात राहात असत. दररोज सायकलवरून शाळेत येत असत आणि कधीही रजा घेत नसत. गुरुजी वेळेच्या बाबतीत खूप पक्के होते. त्याचा आवडीचा विषय होता गणित. त्यावेळेस एक शिक्षक सर्व विषय शिकवत असत. 

त्यांचा आवडीचा विषय गणित असल्यामुळे ते मनात येईल तेव्हा गणित शिकवत असत. मराठी, इतिहास, भूगोल हे विषय त्यांचा मूड झाला तर शिकवत असत. गणित हा विषय मला मुळी आवडलाच नाही. परंतु गुरुजींनी माझी गणिताची एवढी तयारी करून घेतली, की बारावीपर्यंत मला गणितामध्ये ९५ ते ९८ पर्सेंट मार्क मिळायचे. कदाचित पुढील शिक्षणासाठी गणिताचा जास्त उपयोग होऊ शकतो हे त्यांना चांगलेच माहीत होते. गणित हा विषय त्यांची पॅशन होता. पण त्यामुळे ते आमच्यासारख्या निरागस लहान मुलांवर अतिशय अन्याय करत असत.  त्यांच्या नावाप्रमाणेच ते मुलांना सपासप मारण्यात पटाईत होते. पहिली ते चौथीपर्यंत गुरुजी माझे वर्गशिक्षक होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला किती छळले असावे हे तुमच्या लक्षात आले असेलच. त्यात मी शाळेतील हुशार मुलगा; त्यामुळे चुका करण्याची मुभा मला नव्हती. इतर मुलांपेक्षा दुप्पट मार मला बसायचा. छडी वाजे छम छम, विद्या येई घमघम या म्हणीवर त्यांचा कमालीचा विश्वास होता. वर्गात तीस-पस्तीस छोटी चिल्ले पिल्ले. त्यात गणित हा विषय आणि दररोज खाटकडे गुरुजी त्यांच्या हातातील छडी. दर दोन तीन मिनिटांनी छडीचा फटका. त्यावेळेस बाल हक्क आयोग वगैरे नसावेत. हे आताचे फॅड आहे आणि तसे असते तर कदाचित त्या वेळेस गुरुजींवर बालहक्क आयोगाने हजारो केसेस केल्या असत्या. शाळेतील भिंतीवर, गणितातील फार्मूले लिहिलेले असायचे. एखाद्याला एखादे गणित समजले नाही, तर फार्मुले मुलांना वाचायला सांगायचे. मुलींची वेणी पकडून तर ते त्यांना वर उचलत असत आणि फार्मूले वाचायला लावत असत. खाटकडे गुरुजींचा कहर सुरू होता आणि आम्ही तो निमूटपणे अन्याय सहन करत होतो. बोबडे गुरुजी त्यांना अधेमध्ये समजून सांगत असत. मला तर शाळेत जायची इच्छाच व्हायची नाही. छडीचे फटके, पाठीवर बुक्क्या यामुळे आम्ही वैतागलेले असायचो. काही मुलांना त्याचा काहीही त्रास व्हायचा नाही, त्यांनी हे सर्व स्वीकारलं होते. पाठीवरील बुक्के थोडे कमी लागावेत म्हणून मी हिवाळ्यात माझे जाड स्वेटर घालायचो. त्यामुळे मला फारसे लागायचे नाही, पण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात मात्र त्रास होत असे. एकदा एका मुलाच्या डोक्यावर त्यांनी पट्टीने मारले, दुर्दैवाने मुलगा दोन दिवसांपूर्वी खेळताना पडला होता; त्यामुळे डोक्यावर थोडी जखम झाली होती. गुरुजींचा फटका नेमका त्या जागेवर बसला आणि त्यातून रक्त वाहायला लागले. रडत रडत तो घरी गेला आणि मग मोठे महाभारत घडले. 

त्यानंतर बोबडे सरांनी खाटकडे गुरुजींना शेवटचा अल्टिमेटम दिला. गुरुजींनी हात थोडा आखडता घेतला. मला अजूनही माझे गणित चांगले की वाईट हे कळले नाही. परंतु त्यानंतर मला गणितात प्रत्येक वर्गात चांगले मार्क्स पडायचे पण गणिताबद्दल फारसे प्रेमही वाटले नाही. बारावीनंतर गणित सोडून मी दुसरे विषय घेतले आणि आता मी आनंदी आहे.

शासकीय विद्यानिकेतनच्या (आताच्या नवोदय शाळेच्या) प्रवेश परीक्षा तेव्हा मी चौथीत असताना दिल्या.  त्याचवेळेस स्कॉलरशिप परीक्षा देऊन मी पास झालो होतो. शासकीय विद्यानिकेतन मध्ये माझी जाण्याची तयारी सुरू झाली. माझा मोठा भाऊ तेथे शिकत होता. पुढे त्याने दहावीनंतर नाशिकला प्रस्थान केले. मला होस्टेलवर राहायची. आणि शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घेण्याची प्रचंड उत्सुकता होती. पण आईबाबांना थोडी शंका होती. सध्या तेथील क्वालिटी खराब झालेली आहे, अशा बातम्या मध्ये मध्ये येत असत. प्रशासनाचे लक्ष तेथे नव्हते. म्हणून माझा तेथे प्रवेश न घेण्याचा निर्णय आई-बाबा आणि मोठ्या भावांनी घेतला. 

शेवटी नदीच्या पल्याड असणाऱ्या गावात हायस्कूलमध्ये पाचवीला मी प्रवेश घेतला. पाचवी ते दहावीपर्यंतचे शालेय प्रवास खूप छान होता. त्यावेळेस गावातील वातावरण एवढे बिघडले नव्हते. नदी पल्याडच्या गाव हे बाजाराचे ठिकाण होते. सर्व प्रकारची दुकाने तेथे होती. नदी ओलांडून तेथे जायचे आणि किराणा, भाजी वगैरे खरेदी कार्याचे आणायचा असा तो प्रकार होता.

पावसाळ्यात मात्र नेहमी टेन्शन येत असे, मी शाळेत गेलो आणि नदीला पूर आला तर कुठे राहायचे, हा मोठा यक्षप्रश्न मला पडायचा. पावसाळ्यात नदीला नेहमी घोट्यापर्यंत पाणी असायचे; मजा यायची पाण्यातून जाताना. चपला काढायच्या आणि पाण्यातून जायचे, खूप पाणी असेल तर, एकमेकांचा हात पकडून नदी पार करायची असा तो रोजचा दिनक्रम असायचा. 

पाचवी ते सातवी माझ्या वर्गशिक्षिका होत्या रोटे मॅडम. त्या हिंदी आणि इंग्रजी शिकवायच्या. मडघे सर गणित शिकवायचे. बाकी विषयांचे शिक्षक फारसे लक्षात राहिले नाहीत. पण रोटे मॅडमचे माझ्याकडे पूर्ण लक्ष असायचे. एकदा हिंदी चे पेपर तपासण्यासाठी मी त्यांना मदत केलेली आहे. मडघे सर दररोज सकाळी एक तास एक्स्ट्रा क्लास घ्यायचे विनामोबदला, गणित विषय अगदी सोपा करून सांगायचे. हिंदीचे सर होते वर्हेकर सर. त्यांचा एक डोळा बकरीचा आहे असे बरेच विद्यार्थी मानत असत. स्वभावाने ते मृदू होते.  दरवर्षी दसर्‍याला सोने द्यायला आम्ही त्यांच्या घरी जात असू.  त्या वेळेस प्रत्येकाच्या हातावर ते अत्तर लावत असत. 

सातवीनंतर मला वर्गशिक्षक म्हणून विजया उमाळे मॅडम आल्या. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी मला प्रेम दिले. इंग्रजी आणि मराठी विषय अगदी मनापासून त्यांनी शिकवले. त्याचे पती काकड सर आम्हाला केमिस्ट्री आणि बायो शिकवायचे. खूप असा होमवर्क ते द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारायचे. छडीवर त्यांचाही कमालीचा विश्वास होता. उत्तर आले नाही तर हातावर छडी मारायचे. 

आज वयाच्या या टप्प्यावर मागे वळून बघताना वाटते कि ह्या सर्व शिक्षकांचा माझ्या आयुष्यात सहभाग नसता तर आम्ही कसे घडले असतो? अगदी निरपेक्ष भावनेने त्यांनी आम्हाला घडविले. दहावीनंतर मी गावाबाहेर पडलो. आता हे सर्व शिक्षक रिटायर होऊन आपले पुढील आयुष्य जगत असतील. चांगले वाईट हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही, परंतु त्याच्याबद्दलची कृतज्ञाता व्यक्त करणे आपल्या हातात आहे.

शिक्षकदिनाच्या सर्वाना शुभेच्छा!

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन आणि पोथी.कॉम वर प्रिंटेड कॉपीज  उपलब्ध आहेत.)

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

भुताचा जन्म

रात्रीचे आठ वाजले होते. रस्त्यावरील खांबावर विजेचा फिलॅमेंटचा दिवा मिणमिणत होता. त्या अंधुक प्रकाशात ते पाच जण एका जुनाट घराच्या पायरीवर बसून गप्पा मारत होते. घराच्या बाहेर एक जुनी मोठी विहीर होती. शेजारी पिंपळाचे झाड कित्येक शकापासून भारदस्तपणे उभे होते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सावलीसाठी त्याच झाडाचा आधार होता. सध्या हे घर रिकामेच होते. गावात कोणी नवीन शिक्षक बदली होऊन आले कि काही दिवस ह्या घरात राहत असत भाड्याने. पण नंतर ते दुसरेकडे राहायला जात असत किंवा स्वतःच्या गावातून जाणे येणे करणे पसंत करत असत. 

घराची पायरी मोठी होती त्यामुळे बसण्यासाठी आणि शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी ती जागा चपलख होती. त्यामुळे खूपदा लोक तेथे बसून गप्पा मारत असत.  ते पाच जणही असेच बसले होते. गप्पांच्या ओघात भुताखेतांच्या विषय निघाला. शिवारात भूत कोठे आहेत, ते कोणी बघितले, भुतांचे प्रकार किती असतात वगैरे विषयावर गप्पा जोमात आल्या होत्या. त्यातील एकाने स्वतः भूत बघितले असे सांगितले. एकाने तर गावातील खडूस म्हातारा लहान तनपुरे भूत आहे हे शपथेवर सांगितले. तो म्हणे दिवसा माणूस म्हणून वावरतो आणि रात्री भूत असतो. म्हणून तो घरी झोपत नाही. तो नेहमी त्याच्या शेतातील घरातच झोपायला जातो. एकदा काही कामानिमित्त तो भल्या पहाटे त्याच्या शेतात गेला होता म्हणे. त्यादिवशी कदाचित भूतापासून माणूस व्हायला तो विसरला होता म्हणे, म्हणून त्याने म्हाताऱ्याला भुताच्या अवतारात बघितले. भूतापासून माणूस कसा झाला ह्याचे वर्णन त्याने केले. 

एकाने सांगितले कि भुतांमध्ये सुद्धा जातीपाती असतात म्हणे. त्यांची लग्नेही होतात. भुतांचे बरेच प्रकार असतात वगैरे वगैरे. अश्या गप्पा रंगात आल्या असताना, विहिरीत  काहीतरी पडण्याचा जोरात धपकन असा आवाज आला. तो आवाज संपूर्ण आसमंतात निनादला. अचानक आलेल्या त्या आवाजाने सर्वजण घाबरले आणि घाबरून विहिरीकडे बघायला लागले.

"ह्या पिंपळाच्या झाडावर भूत नसेल ना?" एकाने शंका काढली. 

"येथे कसे भूत येईन?" दुसरा 

"तो म्हातारा तनपुरे आला असेल तर? शेतात झोपायला जाताना आला असेल इकडे, बसला असेल पिंपळावर. आणि टाकली असेल उडी पाण्यात." तिसरा घाबरून बोलला.

"भुतांना विहिरीत पोहायला खूप आवडते म्हणे." चौथा बोलला. 

"पण हा म्हातारा लहान तनपुरे आहे हे कशावरून?" एकाने शंका काढली. "ह्या घरात पण भुते असू शकतील? येथे एका महिन्याच्या वर कोणी राहिलेले तू बघितले का?

खूप चर्चेनंतर आणि वादविवादानंतर ह्या घरातच भूत असण्याची शंका आहे, म्हातारा लहान तनपुरे भूत जरी असला तरी त्याला दम्याचा त्रास आहे आणि तो काही एवढ्या थंडीत विहिरीत पोहायचे धाडस करणार नाही, ह्या नित्कर्षाप्रत सर्वजण आले आणि घाबरून सर्वजण तेथून सटकले. 

ह्या पाच जणांच्या गप्पा जोरजोरात चालू असतानां, शेजारच्या घरातील साहेबरावची झोपमोड व्हायला लागली. अर्थात हे पाचजण दररोज त्या पायरीवर येत आणि गप्पा मारत, वादविवाद करत. परंतु त्यांचा गप्पांचा त्रास इतरांना होतो कि नाही ह्याचा मागमूसही त्यांना नसे.  

इकडे साहेबराव बाहेर आला, अंगणात असलेला मोठा दगड उचलला आणि जोरात विहिरीत फेकला. दगड पाण्यात पडला आणि जोराचा धपकन असा आवाज आला. रात्रीच्या निरव शांततेत तो आवाज जरा जास्तच भयाण आणि गूढ वाटला.

काही दिवसानंतर अचानक दोन अफवा वनव्यासारख्या पसरल्या. एक लहान तनपुरेच्या अंगात रात्री भूत येते दुसरी त्या जुनाट घराच्या बाहेर असणाऱ्या पिंपळावर भुते आहेत आणि रात्री ते मनसोक्त विहिरीत आंघोळ करतात.

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन आणि पोथी.कॉम वर प्रिंटेड कॉपीज  उपलब्ध आहेत.)

रविवार, १८ जुलै, २०२१

माझ्या पहिल्या भाषणाची कथा

खरे तर आमच्या शाळेत अवांतर उपक्रम फारसे होत नसत. वर्षातून एकदा शालेय आणि जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धा होत असत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी चे कार्यक्रम वगळता इतर स्पर्धा फारश्या भरत नसत. सर्व स्पर्धा ह्या शैक्षणिक प्रकारात मोडत असत. परंतु मेश्राम नावाचे नवीन मुख्याधापक म्हणून रुजू झाले आणि त्यांच्या पुढाकाराने, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन सारख्या स्पर्धा घेण्याचे ठरले. आम्हा सर्व मुलांना हा अनुभव नवीन होता. स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या. मी तेव्हा आठवीत होतो. सर्व वर्गशिक्षकांना वर्गातील चुणचुणीत स्मार्ट विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धेसाठी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुलांना काय, अभ्यासातून विरंगुळा पाहिजेच असतो. त्यामुळे, मुलांचा अमाप प्रतिसाद मिळाला. ह्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे तर होतीच पण त्यांना संस्थास्थरीय पुढील फेरीत शाळेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार होती.

मी माझे नाव वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत नोंदवले. वादविवादाचा विषय होता, "आपला गाव बरा की शहर”. मी माझ्या गावाच्या बाजूने बोलणार होतो.  वक्तृत्व स्पर्धेसाठी, महात्मा गांधींचा, "खेड्याकडे चला." हा विषय निवडला. मी दोन्ही विषयाची तयारी जोमाने केली. माझ्या ताई कडून, भावाकडून माहिती घेतली.  शाळेतील ग्रंथालयातील पुस्तके चाळली. काकड उर्फ उमाळे मॅडमचे मार्गदर्शन घेतले. आणि दोन्ही विषय रीतसर पणे कागदावर लिहून काढले. 

स्पर्धेचा दिवस उगवला. शाळेच्या मैदानावर तात्पुरते व्यासपीठ उभारल्या गेले होते. मेश्राम सरानी अश्या स्पर्धा का महत्वाच्या आहेत हे समजावून सांगितले. काकड सर, मडघे सर आणि वर्हेकर सर परिक्षक म्हणून नेमण्यात आले. 

स्पर्धेला सुरुवात झाली. वादविवाद स्पर्धा अडखडत पार पडली. खाली बसलेली मुले, हसत खिदळत दाद देत होती, तर कधी ट्रोलिंग करत होती. सर्व मुले व्यासपीठावर जाऊन पहिल्यांदाच बोलत होती. काही स्पर्धकांनी त्यांच्या मित्रांना काहीही बोलले तरी टाळ्या वाजवण्याची तंबी दिली होती. मुलांच्या ह्या वागण्यामुळे स्पर्धकांचे टेन्शन जरा जास्तच वाढले. सोनार सर मधेमधे मुलांत जाऊन शिटीच्या दोरीने सपासप पाठीवर वार करायचे, पण ते गेले की मुलांचा गोंधळ परत सुरु व्हायचा.  

दुसऱ्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. माझे भाषण तयार होतेच. मी ते पाठ केले होते, तरीही काही भाग मी वाचून दाखवला. इतरांच्या मानाने माझे भाषण चांगले झाले होते असेच म्हणावे लागेल. उज्वला बोबडे नावाची ९वी ची मुलगी मात्र मस्त बोलली. चौथी पर्यंत असणाऱ्या आमच्या मुख्याध्यापक बोबडे सरांची ती मुलगी होती.

शेवटी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेत उज्वलाला पहिले, मला दुसरे आणि संजय शिंदेला तिसरे बक्षीस मिळाले. आम्हाला आता संस्थेच्या पुढील फेरीत प्रवेश मिळाला होता. 

काकड मॅडमच्या सल्ल्याने तोच विषय घायचा हा निर्णय मी घेतला. विषयाचे तसे बंधन नव्हते. पण मॅडमने माझ्याकडून पूर्ण तयारी करून घेण्याचे ठरवले. संजय माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे होता. उज्वलाच प्रश्नच नव्हता. ती बोलण्यात हुशार होतीच.

आमच्या गावापासून संस्थेच्या मुख्य कार्यालय असणाऱ्या शाळेत करजगाव येथे पुढील स्पर्धा होणार होत्या. आम्ही सर्वजण आदल्या दिवशी तेथे पोहोचलो. संजय माझा शेजारी होता, त्यामुळे माझी त्याच्यासोबत मैत्री होती. शाळेतच आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संजय आणि मी एकत्र होतो. मी माझ्या विषयांची तयारी करत होतो. संजय मात्र बेफिकीर होता. त्याच्याकडे बघून त्याने हि स्पर्धा फारसी मनावर घेतली असे वाटत नव्हते. मी त्याला त्याच्या तयारीबाबत विचारले. "त्यात काय तयारी करायची, माझ्याकडे आहेत पॉईंट्स कागदावर लिहिलेले." असे बोलून तो गायब झाला. आमची रात्रीचे जेवण आटोपली. 

झोपायच्या आधी, मी लिहिलेले भाषण परत वाचावे असे ठरवले. कागद घेण्यासाठी पिशवीत हात घातला. चार पानाचे मोठया मेहनतीने लिहिलेले माझे भाषण गायब झाले होते. मी ते सगळीकडे शोधले, इतर मुलांनां विचारले. जेथे जेथे गेलो होतो ते तपासले. पण मला माझे कागद काही सापडले नाही. मी आता रडकुंडीला आलो होतो. भाषण बऱ्यापैकी पाठ झाले होते, परंतु कागद समोर पाहिजे होता. काही मुद्दे आठवण्यासाठी तो कागद महत्वाचा होता. मला आता रडू कोसळू लागले होते. आमच्या सोबत आलेल्या मडघे सरांना मी हे सांगितले. 

"तू भाषण पाठ केले आहेस ना? मग घाबरू नकोस, तुझा आत्मविश्वास गमावू नकोस." ते म्हणाले. पुढील पंधरावीस मिनिटे त्यांनी आत्मविश्वास, पाठांतर, प्रगती ह्या विषयावर माझे बौद्धिक घेतले.  

दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून आम्ही तयार झालो. स्पर्धा नऊ वाजता सुरु होणार होती, प्रमुख पाहुणे उशिरा आले म्हणून उदघाटन उशिरा झाले आणि एकदाची ११ वाजता स्पर्धा सुरु झाली. सुदैवाने वक्तृत्वस्पर्धा आधी सुरु झाल्या. वेगवेगळ्या शाळेतून आलेली मुले छान बोलत होती. एकतर माझा कागद हरवला आणि ह्या मुलांची भाषणे बघून माझा आत्मविश्वास तेथेच ढासळला.

त्यात संजयचे नाव पुकारला गेले. तो मोठया आत्मविश्वासाने व्यासपीठावर गेला. त्याच्या हातात एक कागद होता. त्याने विषयाची माहित दिली आणि हे काय! मी लिहिलेले संपूर्ण भाषण त्याने वाचून दाखवले होते. अगदी शब्द न शब्द सारखा होता. म्हणजे संजय ने माझा कागद चोरला होता. मी मनातून संतापलो. संजयचा राग आलेला होताच.  मी पळत मडघे सरांकडे गेलो आणि त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. 

ते म्हणाले. "घाबरू नकोस, त्याने ते भाषण वाचून दाखवले आहे. तू तयारी केली आहेस, ते मुद्दे तू लिहिले आहेस, विषय तुला समजला आहे, त्यामुळे तू बिनधास्त जा आणि भाषण कर. घाबरू नकोस. आणि एखादा मुद्दा आठवला नाही तर लगेच दुसरा मुद्दा घे." त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला. "आणि मी पुढे येऊन बसतो. मध्ये मध्ये माझ्याकडे बघ." त्यांच्या ह्या शब्दांनी मला धीर आला. 

थोड्या वेळाने माझे नाव पुकारल्या गेले. मी भाषणासाठी व्यासपीठावर गेलो. मडघे सर पुढे येऊन बसले होते. त्यांनी स्मित दिले. माझ्यासमोर मुलांचा महासागर बसला होता. मी शेवटच्या रांगेतील मुलाकडे बघितले. आणि मी बोलायला सुरुवात केली. "गाव, माझा गाव, तुमचा गाव, मुळातच गावातील माणसे रांगडे असली तरी मनाने भावनिक असतात. चेहऱ्यावर मुखवटे आपण लावत नाहीत, आणि मुखवटे लावले तरी ते आपल्याला झेपत नाहीत, आणि कदाचित म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले असतील, खेड्याकडे चला." मी सुरुवात केली, क्षणभर थांबलो, प्रेक्षकांचा अंदाज घेतला. आणि दुसऱ्याच क्षणाला टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर पुढील वीस मिनिटे मी बोलत होतो. संजय ने माझेच भाषण वाचून दाखवले होते, अडखडत, आणि मी तेच माझे भाषण उत्स्फुर्तपणे केले होते. बोलण्याच्या ओघात, करजागावातील चांगल्या गोष्टींचा मला दिसलेला उल्लेखही मी केला. 

मी खाली उतरलो. मडघे सर, माझ्याकडे आले आणि त्यांनी माझी पाठ थोपटली. शेवटी संध्याकाळी स्पर्धेचा निकाल परीक्षकांनी जाहीर केला. त्यात त्यांनी माझ्या भाषणाचा उल्लेख केला. "विनोद बिडवाईक ह्या स्पर्धकाने केलेले स्पर्धेतील भाषण, आधी दुसऱ्या स्पर्धकाने पण केले, पण विनोद चे भाषण उस्फुर्त होते. एखाद्याने कितीही नक्कल केली तरी त्याला मूळ गुणवत्तेची सर येत नाही हे आपण लक्षात ठेवायला हवे. " परीक्षकाने संजयचे कान पण टोचले होते. पण हे ऐकायला संजय तेथे नव्हता, तो केव्हाच पसार झाला होता.  

मला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. पुढील काही दिवस संजय माझी नजर चुकवत फिरत होता.

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)

शनिवार, १० जुलै, २०२१

वाघिणीचे दूध

मला इंग्रजीमध्ये चांगले गुण पडत असत. काकड मॅडम आमच्या वर्गशिक्षिका होत्या आणि त्या इंग्रजीही शिकवत असत. इंग्रजी चांगले लिहायला जमत असे, पण इंग्रजी बोलायची अर्थात पूर्ण बोंब होती. त्यावेळी मी सातवीत वगैरे असेन. माझा भाचा हा इंग्रजी माध्यमात पहिलीत वगैरे शिकत असावा. माझी मोठी बहीण आणि मोठे भाऊ नाशिक जवळ ओझर ला राहत असत. एकदा त्याने मला इंग्रजीत पोस्टकार्ड पाठवले. त्याला काय उत्तर द्यायचे ह्याचे मला टेन्शन आले होते. एवढा लहान मुलगा इंग्रजीत काय छान लिहितो याचा आनंद मानायचा की आपल्याला एवढे चांगले इंग्रजी येत नाही ह्याचे दुःख करावे ह्या द्विधा मनस्थितीत असताना माझ्या दुसऱ्या ताईने मला समजावले. "अरे तो इंग्रजी माध्यमाचा आहे. म्हणून त्याची इंग्रजी चांगली आहे. तुझे मराठी छान आहेच की, तू त्याला मराठीत उत्तर दे." 

मला हे पटले. आणि मी त्याला मराठीत उत्तर लिहिले.  

अर्थात मी पत्राची सुरुवात, "मला इंग्रजी जमत नसल्यामुळे, मी तुला मराठीत उत्तर देत आहे." अशी केली. त्याला ते पत्र माझ्या मोठया ताईने वाचून नक्कीच दाखवले असेन.   

दहावीनंतर शिकायला भावाकडे नाशिकला आलो. कॉलेज मध्ये माझ्या आजूबाजूला सर्वजण इंग्रजी कोळून प्यायलेले होते. निदान तसे ते भासवत तरी होते. माझी वऱ्हाडी मराठी आणि त्यात सुमार इंग्रजी ह्यामुळे मला कमालीचं न्यूनगंड वाटायला लागला.   

माझे काही चांगले मित्रही झाले. त्यांनी सांभाळून घेतले. पण नंतर सवय झाली. भाषेवरून खुपजण टोमणे मारायचे पण मी दुर्लक्ष करू लागलो. वाचायची आवड असल्यामुळे, वाचन सुरु होतेच, त्यात इंग्रजीही जोमाने वाचू लागलो. बारावीला प्रिलीम ला मला क्लास मध्ये सर्वात जास्त मार्क्स मिळाले. शेवाळे सर तेव्हा इंग्रजी शिकवत असत, त्यांनी मला स्टाफ रूम मध्ये बोलवून घेतले आणि माझे कौतुक केले. त्यानंतर अर्थात फायनल मध्येही मला वर्गात जास्त मार्क्स मिळाले.

स्केच: अथर्व बिडवाईक
(स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा ह्या पुस्तकातून)
काकड मॅडमने इंग्रजीचा पाया पक्का केला होताच. माझी इंग्रजीत लिहिण्याची अडचण नव्हतीच, इंग्रजीत बोलण्याची होती. पण शब्दसंग्रह वाढवावा लागणार होता. शिक्षण वगैरे झाले. नोकरी शोधताना मात्र आपल्या देशात अजूनही इंग्रजांचे वंशज आहेत ह्याची जाणीव पदोपदी होत असे. फॅक्टरीमध्ये, सर्व मराठी असणाऱ्या कामगारांसोबत फक्कड इंग्रजी का गरजेची आहे हे मला कळत नसे. शाळेत आणि कॉलेजात मी सिन्सियर विद्यार्थी होतो. माझ्याकडे ज्ञान होते, कन्टेन्ट होता, आत्मविश्वास होता पण माझ्याकडे एक्सपोजर नव्हते.  

मराठी आणि इंग्रजी पुस्तके मी अध्याश्यासारखी वाचली. कॉलेज पासून वृत्तपत्रात स्तंभ लेखन करू लागलो. मराठी वृत्तपत्रात वेगवेगळ्या विषयावर माझी लेखमाला प्रसिद्ध होत असे. माझे लेख लोकांना आवडतही असत. इंडियन स्टील मध्ये काम करत असताना करिअर ग्रोथ साठी मी बऱ्याच मुलाखती देत असे. खूपदा मी दुसरा आणि तिसरा राऊंड पार करत असे. बऱ्याचदा शेवटच्या राऊंड मध्ये दुसऱ्या बाजूला सुटाबुटात बसलेल्या मराठी आणि अमराठी लोकांना मात्र माझी मराठी स्टाइल ची इंग्रजी पचनी पडत नसे. 

असाच एकदा मी शेवटच्या राऊंड मध्ये साऊथ इंडियन मुलाखतकर्त्याला प्रश्न विचारला (अर्थात इंग्रजीत), "सर तुमचा मला काही सल्ला आहे का?"

"तुझे इंग्रजी पॉलिश नाही."

"तुमच्या औरंगाबाद च्या फॅक्टरी मध्ये माझा रोल हा फॅक्टरी एच आर ऑफिसर चा आहे, आणि माझ्या माहितीप्रमाणे तेथे सर्व कामगार मराठी आहेत, मला त्यांच्याशी मराठीत संवाद साधावा लागणार आहे ना."

"ते खरे आहे, पण कार्यालयीन भाषा इंग्रजी आहे."

"मला उत्तम इंग्रजी लिहिता येतं."

ह्यावर तो काहीही बोलला नाही. शेवटच्या राऊंड मध्ये माझा पत्ता कापला गेला. 

कॉर्पोरेट जगात लोकांना, दाक्षिणात्य पद्धतीचे इंग्रजी चालते, उत्तरेकडचे इंग्रजी चालते. परंतु मराठी पद्धतीचे इंगजी चालत नाही. 

परदेशातील, इंग्रजी बोलणारे देश सोडून, सर्व देश आपल्या मातृभाषेत व्यवहार करतात. त्यांची इंग्रजीही फारसी चांगली नसते. पॉलिश इंग्रजीच्या अवास्तव अपेक्षांचा कोरोना काही लोकांच्या डोक्यामध्ये इतका भिनलाय की इंग्रजी म्हणजे विद्वत्ता असा त्यांचा समज झालेला आहे.  अनेक विद्वान आणि ज्ञानी लोक इंग्रजी बोलता येत नाही म्हणून आत्मविश्वास गमावून बसलेत किंवा त्यांना बाजूला टाकण्यात आलेले आहे. अनेक डिझायनर लोक फक्त इंग्रजी बोलता येते म्हणून विद्वान समजले जाताहेत.

अर्थात ह्या लोकांची थोबाड बंद करण्यासाठी मी माझ्या भाषेवर लक्ष दिले. वरिष्ठ पदापर्यंत जायचे असेल तर इंग्रजीवर प्रभुत्व महत्वाचे ठरते.  इंग्रजी हि जागतिक व्यवहाराची भाषा आहे आणि प्रयत्न केला तर ती अतिशय सोपी आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो.

इंग्रजी ही चांगली नोकरी मिळण्यात अडथळा आहे हे जाणून मी इंग्रजी पॉलिश करायला सुरुवात केली. शब्द उच्चारणा वर भर दिला इंग्रजी भाषा आणि शब्दसंग्रह विकसित करण्यासाठी टीव्ही वर इंग्रजी कार्यक्रम, वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचण्यात माझ्या रात्र जागवल्या.  कोणताही नवीन इंग्रजी शब्द शिकला की मी तो एका वहीमध्ये लिहून काढत असे. पुढील संभाषणात मी तो शब्द मुद्दामून वापरण्याचे सुनिश्चित करत असे. माझ्या बॉसच्या परवानगीने, मी एका इंग्रजी दैनिकात रात्रपाळीची नोकरी पत्करली. तेथे मी आतील काही पाने संपादित करत असे. मी इंग्रजी भाषा कौशल्ये शिकलो; मी माझ्या शब्दसंग्रहात सुधारणा केली; मी ह्या विषयांवर ज्ञान मिळविले. 

मी एकच केले, मी हे सर्व सकारात्मकतेने घेतले आणि आत्मविश्वासाने सुधारणेला सामोरे गेलो. आज मी वेगवेगळ्या फोरम वर लोकांशी तेवढ्याच ताकदीने इंग्रजीतून संवाद साधत असतो.

नवीन आरोग्यमंत्री श्री मनसुख मंडाविया ह्यांचे काही जुने ट्विट काढून त्यांच्या इंग्रजीची थट्टा उडवणारे लोक नवीन नाहीत. देशाला स्वातंत्र मिळून ७३ वर्षे झाली, परंतु अजूनही इंग्रजांची पिलावळ परकीय मानसिकता सोडायला तयार नाही.    

असे लोक तुम्हाला आयुष्याच्या प्रवासात क्षणोक्षणी मिळतील. त्याचे बोलणे निश्चित ऐका आणि त्यांना दाखवून द्या तुम्ही त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहात.

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)

शनिवार, २६ जून, २०२१

धर्म, हिंदू संस्कृती आणि त्याचे तत्वज्ञान

कार्ल मार्क्स कधीतरी, "धर्म ही अफूची गोळी आहे!" असे सांगून गेला आणि आपल्या देशातील काही अतिहुशार लोकांनी, बाजारू विचारवंतांनी आणि त्याच्या काही जागतिक शिष्यांनी त्याचा वापर आपली सत्ता बळकट करण्यासाठी आणि बुद्धिभेद वाढवण्यासाठी  केला. कार्ल मार्क्सची विचारसरणी ही तेव्हा धर्मसत्ता आणि राजसत्तेने भोळ्या आणि गरीब लोकांवर केलेल्या अन्यायाच्या संदर्भात होती. धर्मसत्तेने राजसत्तेवर ठेवलेला अंकुश तेव्हा राजकारणातील ढवळाढवळ ठरत होता तेव्हाची ही गोष्ट आहे. इंग्लड, युरोप मध्ये तेव्हा धर्मसत्तेने कहर माजविला होता. तिकडे अरब मध्ये तर धर्मसत्ताच राजकीय सत्ता झाली होती. भारतातही काही गोष्टींचा अतिरेक झाला होता. 

धर्म नैतिक चौकट तयार करण्यात आणि दररोजच्या जीवनातील मूल्यांसाठी आवश्यक ठरते. काही गोष्टी कालबाह्य होतात, तेव्हा समाजातील विचारवंतांनी एकत्र येऊन त्या कालबाहय गोष्टीबद्दल विचारमंथन करून समाजजागृती करायला हवी. धार्मिक दृष्टीकोन एखाद्या व्यक्तीचे चरित्र निर्माण करण्यास मदत करतो. दुसर्‍या शब्दांत, धर्म समाजकारणाची संस्था म्हणून काम करते. अशा प्रकारे, प्रेम, सहानुभूती, आदर आणि सुसंवाद यासारख्या मूल्ये निर्माण करण्यास धर्म मदत करतो. 

परंतु आजकाल हे तथाकधीत विचारवंत एखाद्या धर्मातील विशिष्ट प्रथांवर आघात करताना त्या धर्माला आरोपीच्या पिंजऱ्यात जमा करतात. हिंदू धर्म हा नेहमी प्रवाही राहिलेला आहे. इतर सर्व धर्मात कोणीतरी एक प्रेषित आहे. हिंदूंचा असा कोणताही प्रेषित नाही. जैन, बुद्ध, बसवराज इत्यादी प्रेषितांनी वेगळे धर्म प्रस्थापित केले असतील. परंतु त्यांच्या तत्वज्ञानाचा पाया हिंदू तत्वज्ञावरच आधारित आहे. ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांचे प्रेषित हे बंडखोर होते आणि त्यांनी तेव्हाच्या प्रचलित धर्माच्या वाईट प्रथेविरुद्ध आवाज उठवला. शेवटी प्रत्येक धर्माच्या पद्धती वेगळ्या असतील, मार्ग वेगळे असतील परंतु ध्येय एकच आहे. मनाची शांतता आणि मोक्ष हे दोन उद्देश प्रत्येक धर्माचा सार आहेत. अनिष्ट प्रथांच्या विरुद्ध जन्माला आलेले, प्रेषितांनी निर्माण केलेल्या धर्मांचा आणि धर्मग्रंथांतील अर्थांचा अनर्थ दुर्दैवाने त्यांच्या अनुयानांनी काढला आणि केवळ धर्मप्रसार एवढाच उद्देश ह्या धर्माचा राहिला. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी त्यांनी ठेवली. 

हिंदू धर्म मुळात धर्म नव्हे, तो एक जगण्याचा मार्ग आहे. हिंदू धर्माचा कोणी एक प्रेषित नाही. त्यामुळे ज्या काही चालीरीती धर्मात आहेत त्या लोकांच्या मनाप्रमाणे त्यावेळेस असणाऱ्या परिस्थितीनुसार आलेल्या आहेत. विशेष म्हणजे हिंदू धर्म लवचिक आहे, कारण काय करायचे आणि काय नाही ह्याचे स्वातंत्र ते प्रत्येकाला देते.  

हिंदू धर्म मुळातच प्रवाही आहे, तो काळाप्रमाणे बदलत गेला आहे. अजूनही इंग्लडची राणी हि चर्चची प्रमुख आहे. जगातील बहुतांश देश हे धर्माधित आणि धर्माधीन आहेत. हिंदू धर्माने राजसत्ता होण्याचा कधी प्रयत्न केला नाही. जेवढे प्रबोधन हिंदू धर्मातील संतांनी केले तेवढे कोणीही केले नसेल. हिंदू धर्मातील चुकीच्या पद्धतीवर संतांनी आघात केले आणि लोकांनी ते मानले, अंगिकारले. बुवाबाजी, अंधश्रद्धा ह्या गरिबीमुळे आणि लोकांच्या असहायतेमुळे निर्माण होतात आणि काही धर्ममार्तंड त्याचा फायदा घेतात, परंतु केवळ मूठभर लोकांसाठी संपूर्ण धर्म वाईट आहे हे ठरवणे हा आताच्या विचारवंताचा आणि तथाकथित पुरोगामी मंडळींचा हलकटपणा आहे. 

हिंदू धर्मात मूर्तिपूजा आहे, इतर धर्मात ती मानल्या जात नाही, मूर्ती एक प्रतीक आहे, भाव व्यक्त करण्याचे साधन आहे. प्रत्येक धर्माचे असे एक प्रतीक अथवा साधन आहे. क्रूस, चर्च, मस्जिद, अग्यारी वगैरे वगैरे हीही साधने नव्हेत का? मानलेल्या देवापर्यंत, जाण्याचे हे सर्व साधने आहेत, मार्ग आहेत, प्रतीके आहेत. फक्त त्या त्यांच्या कीती आहारी जायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.

हिंदू धर्म जगण्याचा मार्ग असल्यामुळे, सर्व प्रकारची जीवन कौशल्ये आपण जगत आलेलो आहोत. 

हिंदू धर्म ही एक वैविध्यपूर्ण प्रणाली आहे ज्यामध्ये तत्वज्ञान आणि सामायिक संकल्पना, धार्मिक विधी, विश्‍वविद्या प्रणाली, तीर्थक्षेत्र आणि ज्ञान आहेत. धर्मशास्त्र, मेटाफिजिक्स, वेगवेगळे वेद, पौराणिक कथा, वैदिक यज्ञ, योग, गतिशील धार्मिक विधी आणि मंदिर बांधणी ह्यासारखे अनेक विषय हिंदू धर्मात आहेत. अगदी जगण्याच्या पद्धतीपासून तर वैद्यकीय पर्यंतचे शिक्षण वेगवेगळ्या ग्रंथात सांगितलेले आहे. 

हिंदू श्रद्धास्थान असणाऱ्या विषयांमध्ये चार पुरुषार्थ, मानवी जीवनाचे ध्येय किंवा उद्दीष्टे यांचा समावेश आहे. खालील तत्वज्ञान बघा. 

  • नीतिशास्त्र आणि कर्तव्ये, 
  • अर्थ:समृद्धी आणि आर्थिक जबाबदाऱ्या
  • काम: इच्छा आणि आकांक्षा
  • मोक्ष: मृत्यू आणि पुनर्जन्म

हिंदु धर्मात प्रामाणिकपणा, अहिंसा, धैर्य, सहनशीलता, संयम, सद्गुण आणि करुणा यासारख्या इतर कर्तव्याचे वर्णन केले गेले आहे. मला वाटते वरील तत्वज्ञान हे प्रत्येक धर्मात समान असावे. 

काही विधी आणि पद्धती ह्या मनाच्या समाधानासाठी आणि मनशांतीसाठी आवश्यक आहेत. हिंदू धर्म लोकांना गुन्हा आणि पाप करण्यापासून परावृत्त करते. प्रत्येक धर्म जगायला शिकवतो आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. फक्त तो समजून घ्यायला हवा.

त्यामुळे मी प्रत्येक धर्माचा आदर करतो परंतु हिंदू धर्माचा मला अभिमान आहे कारण माझ्यामते माझ्यासाठी हा धर्म नव्हे तर जगण्याचा एक मार्ग आहे. अध्यात्माचे देणे जगाला देण्याचे महान कार्य हिंदू संस्कृतीने केले आहे. माझ्या धर्मातील चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा आणि आजच्या काळात योग्य नसणाऱ्या गोष्टी त्यागण्याचा पूर्ण अधिकार मला हिंदू धर्म देतो.    

धार्मिक असणे आणि धर्मांध असणे ह्यात फरक आहे. अध्यात्मिक उन्नती करण्यासाठी धर्मांध असण्याची गरज नाही. त्यामुळे धर्म, हिंदू संस्कृती तरी, ही अफूची गोळी नाही, तर आयुष्याला एक उद्देश देण्याचे साधन आहे.  

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)

रविवार, २० जून, २०२१

आमचे बाबा

आज जागतिक पितृदिन आहे. पण वडील हे फक्त एकाच दिवशी आठवायचे असतात का? वडील हे आपल्या आयुष्यात नेहमीच असतात. आपल्या मुलांचा अभिमान फक्त आपल्या आई वडिलांनाच असतो. वडील कठोर असतात, ते शिस्त लावतात हा आपला समज असतो पण त्यामागे निव्वळ मुलांचाच विचार असतो. 

प्रत्येक वडील हे आपल्या मुलांसाठी हिरो असतात. मुले कितीही मोठे होऊ दे, त्याची चिंता काही सुटत नाही. मुले मोठी झाली, कमावती झाली, आपले निर्णय स्वतः घेत असली तरी, त्यांची मुलाबद्दलची काळजी काही कमी होत नाही. 

मुले आईच्या खूप जवळ असतात, परंतु घराची आणि भविष्याची चिंता वडील काही सोडत नाही. आपले काय होईल हा त्याचा विचारच नसतो, आपल्यानंतर आपले काय होईल ह्याची काळजी मात्र त्यांना पोखरत राहते. मुलांनां मात्र आपले वडील जरा जास्तच विचार करतात असे वाटते. 

वडील आयुष्यभर कर्तव्याचे ओझे वाहत राहतात. 

माझे वडील तसे शांत आणि दुसऱ्यांचा विचार करणारे होते. मी सर्वात धाकटा असल्यामुळे माझ्यावर त्याचा खूप जीव होता. घरी यायला थोडा उशीर झाला तरी ते काळजीत असत. माझ्या अभ्यासावर त्यांचे कडक लक्ष असे. परंतु माझ्याकडून झालेल्या चुकांवर ते कधीच मला रागावले नाही. स्वभावाने ते थोडे हळवे होते. आपल्या मुलांना काय वाटेल हाच विचार ते शेवटपर्यंत करत राहिले. 

त्यांचा हळवेपणा प्रत्येक प्रसंगात दिसत असे. दहावीनंतर जेव्हा मी शिक्षणासाठी गाव सोडले, तेव्हा ते मला वेशेपर्यंत सोडायला आले होते. मी मोठया शहरात माझ्या मोठ्या भावासोबत राहणार होतो. त्यावेळेस मी दूर जाण्याच्या कल्पनेने, त्यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंची किंमत मला त्यावेळेस समजलीच नाही.   

घरातील सुनांना आपल्या मुलींप्रमाणे वागवणारे ते होते. कधी गरज पडली तर त्यांना मदत करायला त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. त्यांच्या नातवंडांचे ते लाडके आजोबा होते. आम्हा सर्व भावंडाच्या छोट्या छोट्या गोष्टीचा त्यांना खूप अभिमान असे. त्यांच्या शेवटच्या दिवसात ते भावाकडे होते आणि मी मुंबईला जॉब करत होतो, पण ते माझी प्रत्येक आठवड्याला वाट पाहत असत. कधीतरी नाही जमले तर ते अस्वस्थ होत असत.

त्यांच्यासाठी त्यांच्या मनासारखे मला फारसे काही करता आले नाही परंतु आज त्यांचे अस्तित्व आजूबाजूला जाणवत राहते.  आज माझा एकही दिवस त्यांच्या आठवणींशिवाय जात नाही.

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)

रविवार, ६ जून, २०२१

एका चित्राची किंमत

दाशिव खूप असा सधन नव्हता, परंतु इतर गावकऱ्यांपेक्षा सधनच म्हणावा लागेल. शिक्षितही होता. इरिगेशन विभागातून निवृत्त झाला होता. टुमदार घर, छोटीसी बागायती शेती आणि एक मुलगा असा त्याचा संसार होता. त्याची बायको काही वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाली होती. त्याने दुसरे लग्न करायचे टाळले, ह्याचे एकमेव कारण होते त्याचा मुलगा, प्रफुल. सदाशिव आपल्या मुलासोबत राहत होता. यशवंत आणि त्याची बायको बायजा सदाशिवकडे घरगडी म्हणून काम करत होते. सदाशिवच्या घरचेच ते झाले होते. सदाशिव सुखी आणि आनंदी दिसत असला तरी आतून फारच अस्वस्थ आणि दुखी होता. दुर्दैवाने मुलगा, प्रफुल, मतिमंद होता. परंतु सदाशिवचा प्रफुलवर खूप जीव होता. त्याच्यावर त्याने मनापासून प्रेम केले होते. मुलगा पाच वर्षांचा होता तेव्हा त्याची आई मरण पावली. त्यामुळे तर तो मुलाला खूप जपत असे. 

माझ्यानंतर मुलाचे काय होईल ह्या विचाराने त्याला झोप येत नसे. खूपदा तो माझ्या आई बाबा सोबत ह्या विषयावर बोलत असे. आई बाबा त्याची समजूत काढत असत. 

काही वर्षांनी सदाशिवला अचानक हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा पोरका झाला. अचानक सदाशिवच्या नातेवाईकांची गर्दी गावात वाढायला लागली. जे कधी गावात आयुष्यात आले नाहीत तेही दूरचे नातेवाईक गावात दिसू लागले. सर्वांचा डोळा सदाशिवच्या घरावर आणि शेतीवर होता. 

एकमेकांत भांडणे सुरु झाली. प्रकरण, पोलिसात आणि नंतर कोर्टात गेले. शेवटी दोन तीन चिवट नातेवाईकांनी आपणच सदाशिवचे वारसदार आहोत असे कोर्टात ठासून सांगितले.  ह्या सर्व गदारोळात प्रफुलची काळजी मात्र फक्त यशवंत आणि बायजाच घेत होते. काही दिवसांनी प्रफुलला शहरातील रिमांड होम मध्ये हलवण्यात आले. यशवंत आणि बायजा कधीकधी प्रफुलला भेटायला नियमित जात असत. 

सदाशिवचा तालुक्याचा ठिकाणी एक वकील मित्र होता. त्याला हि सर्व परिस्थिती माहित होती. सदाशिवच्या संपत्तीतुन मुलाचे संगोपन करण्यासाठी एक ट्रस्ट तयार करावा असा त्याचा प्रस्ताव होता. शेवटी एकदोन वर्षांनी नातेवाईकांचा क्लेम कोर्टाने फेटाळून लावला. नातेवाईकांचा उद्देश हा स्वार्थी आहे हे लक्षात आल्यावर कोर्टाने प्रफुलच्या नावाने ट्रस्ट स्थापन करण्याचा आदेश दिला. मुलगा हे सर्व सांभाळण्यासाठी समर्थ नाही म्हणून सदाशिवचे घर, शेती आणि इतर मालमत्ता लिलाव करण्याची आणि आलेला पैसे ट्रस्ट मध्ये जमा करण्याची परवानगी कोर्टाने दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील एक सक्षम अधिकारी लिलाव अधिकारी म्हणून नेमण्यात आला. लिलावाची नोटीस गावात लागली. लिलावाचा दिवस ठरला. इतर गावातून आणि शहरातून बरेच लोक भाग घेण्यासाठी आले.   

सर्वप्रथम, एक चित्राच्या फ्रेम ची बोली लागली. ते चित्र प्रफुल ने काढले असावे. सदाशिवने मोठ्या प्रेमाने ते चित्र फ्रेम करून ठेवले होते. कोणीही त्या फ्रेमला बोली लावायला पुढे आला नाही. लिलाव अधिकाऱ्याने ती फ्रेम बाजूला फेकण्यासाठी उचलली. त्या फ्रेमचे महत्व ते काय. एका लहान मतिमंद मुलाने काढलेले चित्राची किंमत ती काय?

तोच गर्दीतून, बायजाने हात वर केला. "मला घ्यायची आहे ते चित्र." ती ओरडली. तिचे डोळे पाणावले होते. कित्येक वर्षांपासून ती आणि तिचा नवरा त्या घरात वावरले होते. स्वतःला कोणीही मुलबाळ नव्हते, सारी माया तिने प्रफुलवर ओवाळली होती. प्रफुलच्या आठवणीने तिला रडू कोसळले.

"बोली लाव." गर्दीतून कोणीतरी ओरडले.

"पन्नास रुपये" बायजा म्हणाली. 

त्या चित्रावर कोणीही चढती बोली लावली नाही. शेवटी ती फ्रेम, बायजाला मिळाली. फ्रेम हाताळताना अचानक ती खाली पडली. काच फुटली. हवेमुळे चित्र एका बाजूला गेले. बायजाने ते उचलले. चित्राच्या विरुद्ध बाजूला एक स्टॅम्पपेपर चिकटवला होता. लिलाव अधिकाऱ्याच्या सहाय्यकाने ते चित्र परत घेतले आणि तो स्टॅम्पपेपर बाहेर काढला. ते चक्क हाताने लिहिलेले मृत्यूपत्र होते आणि त्यात लिहिले होते, "माझ्या मृत्यूनंतर, सर्व संपत्तीचा आणि वस्तूचा लिलाव करण्यात यावा.  आलेल्या पैशातून माझ्या मुलाच्या नावाने ट्रस्ट बनवण्यात यावा. परंतु माझ्या मुलाच्या ह्या चित्राचा मनापासून स्वीकार करणाऱ्या व्यक्तीलाच त्या ट्रस्टचे अधिकार द्यावेत. मुलाला काही झाले, अथवा त्याचा अचानक मृत्यू झाला तर माझी सर्व संपत्ती चित्र घेणाऱ्या व्यक्तीलाच देण्यात यावी. भविष्यकाळात माझ्या मुलानंतर माझा वारसदार, जो कोणी हे चित्र घेईल तोच होईल.” पुढे तारीख आणि सर्व मालमत्तेची माहिती दिली होती.     

लिलाव संपला. परंतु सर्व गावात ह्या प्रकारची खूप चर्चा झाली. मृत्यूपत्र खरे कि खोटे? बायजाला ते चित्रच का आवडले? असे फाटे पाडण्यात आले. कोर्टाच्या आदेशानुसार परत मृत्युपत्राची शहानिशा करण्यात आली. मृत्यूपत्र खरे निघाले. बायजाने चित्राला बोली मनापासून लावली होती, प्रफुलच्या प्रेमापोटी. प्रफुलने काढलेल्या चित्राची किंमत सामान्य बायजाला कळली होती हे मात्र पक्के. 

पुढे प्रफुलच्या नावाने ट्रस्ट करण्यात आला. यशवंत आणि बायजाने प्रफुलचा स्वतःच्या मुलासारखा सांभाळ केला.

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)

रविवार, २३ मे, २०२१

मी विठ्ठलाला जाणतो

"तुम्ही गाणे आणि अभंग जाणता. मी विठ्ठलाला जाणतो."

रवर्षी भागवत सप्ताहात, आमच्या गावी एक कीर्तनकार येत असे. आईचे ते गुरु होते. ते अतिशय सुंदर पद्धतीने कीर्तन करत असत. काही दिवस आधी, त्यांचे नित्यनेमाने प्रवचनही होत असे. छोट्या-छोट्या पुराणातील गोष्टी, रामायण-महाभारतातील दाखले, विनोदी किस्से सांगून ते लोकांचे प्रबोधन करत असत. माझ्या प्रायमरी शाळेच्या पटांगणावर हा भक्तीमय कार्यक्रम होत असे. शाळेच्या व्हरांड्यावर त्यांचे व्यासपीठ असे.

रात्री ८ नंतर जेवण आठवून गावातील सर्व आबालवृद्ध मंडळी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावत असत. बुवांना साथ देण्यासाठी गावातील भजनी मंडळ सोबत असे.  उत्साही आणि होतकरू मंडळीनी हे भजनी मंडळ स्थापन केले होते. अर्थात त्यात स्वतःला उत्कृष्ट गायक आणि वादक समजणारेच जास्त असत. गावातील जगप्रसिद्ध डॉक्टर बदरके हे कधी कधी भजन म्हणायला येत असत.  महादेव भोई हा पितळेच्या हंड्यावर पितळेचीच परात ठेवून हातातील स्टीलच्या कड्याने लयबद्ध आवाज काढत असे.  त्याचीही साथ महत्वाची असे. चिपळ्या, मृदंग, टाळ, हार्मोनियम पेटी वाजवणारे सर्वजण होतकरू होते. कधीतरी कोणाचा सूर बिघडत असे, पण इतरजण सांभाळून घेत असत. लोकही अश्या गोष्टी सांभाळून घेत असत. Perfection ची कोणालाही अपेक्षा नसे. लोक मोठ्या तन्मयतेने हे कीर्तन, प्रवचन आणि मध्ये मध्ये भजन ऐकत असत. ह्या कालावधीत गावातील वातावरण भक्तीमय होऊन जात असे. भांडणे कमी झालेले असत, कधीही एकमेकांना सरळ नावाने हाक  मारणारे एकमेकांची विचारपूस करत असत.

बुवा मात्र निश्चितच उत्कृष्ट गायक होते. अतिशय आर्जवतेने ते विठ्ठलाचे भजन गात असत. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले "माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई, माझे माहेर पंढरी भिवरेच्या तीरी"  हा अभंग त्यांच्या अतिशय आवडीचे असे. अतिशय मन लावून ते हा अभंग गात असत. दरवर्षी लोक त्यांच्या या भजनाला टाळ्या वाजवून दाद देत असत. हा अभंग कार्यक्रमाचा क्लायमॅक्स असे. 

एके दिवशी कीर्तन चालू असताना, बुवांनी हार्मोनियम वाजवणाऱ्या रघुनाथला  नेहमीची परिचित अशी खूण केली. पेटी वाजवणाऱ्या रघुनाथला बुवांना आता कोणता अभंग म्हणायचं आहे हे कळले आणि त्याने पेटीला सुर लावला. 

तोच खाली बसलेल्या गर्दीतील एक जण उभा राहिला, त्याने हात वर केला. तो दुसरा तिसरं कोणी नसून, नदीपल्याड असणाऱ्या गावातील, बाजीराव आखरे होता. बाजीराव हा विठ्ठलाचा भक्त होता. दरवर्षी नेमाने वारी करणारा होता. त्याचा स्वभाव अतिशय सोज्वळ होता. कोणाच्या मध्ये कधीही नाक न खुपसणाऱ्या बाजीरावाला बघून सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. 

सगळीकडे अचानक शांतता झाली. आता बाजीराव ला नेमके काय करायचे आहे, हे कोणाला कळेना. तोच भगवानराव तनपुरे यांनी त्याला दरडावून विचारले, "अरे काय करायचे आहे तुला बाजीराव?"

"मी तिथे येऊ का?" बाजीरावने विचारले 

बुवांनी अतिशय प्रेमाने त्याला व्हरांड्यावर बोलावले. 

"हा बोल, काही प्रश्न आहे का? त्यांनी विचारले.  

"नाही प्रश्न तर नाही, पण तुम्ही हा जो अभंग म्हणता, तो अभंग आज मी गायला तर चालेल का?" 

"तुला येतो का?" बुवांनी विचारले. 

"हो." 

"मग काही हरकत नाही." असे म्हणत  बुवांनी आपल्या गळ्यात असलेले टाळ त्याच्या गळ्यात टाकले. आणि त्याला माईक समोर उभे केले.  

रघुनाथने पेटीला सूर लावला. बाजीराव ने डोळे मिटले आणि अतिशय मधुर आवाजात अभंग गायला सुरुवात केली. अभंग गात असताना तो जणू विठ्ठलाशी एकरूप झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे  निरागस भाव आणि अभंगातून तो करत असलेले आर्जव  बघून बुवा आणि व्हरांड्यावरील व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना अतिशय अप्रूप वाटले. बाजीराव तरुण होता पण भक्तिरसाने न्हाऊन गेला होता. अभंग तन्मयतेने तल्लीन होऊन गात असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.  

खाली बसलेले आबालवृद्ध कानात प्राण आणून, त्याचा तो अभंग ऐकत होते. अभंग संपला आणि संपूर्ण मैदानावर टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडाट झाला. बुवा हा अभंग दरवर्षी गात असत, पण बाजीरावने गायलेल्या अभंगाला  जो प्रतिसाद मिळाला तो त्यांना कधीच मिळाला नव्हता. प्रेक्षक त्या तरुण व्यक्तीच्या उत्कट अभंगाने इतके प्रभावित झाले होते की कित्येकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 

बुवांनी अगदी मनापासून त्याचे कौतुक केले आणि विचारले, "मी कित्येक वर्षांपासून हा अभंग गात आहे. शास्त्रीय संगीताची मला समज आहे. पण मला भक्तांचा एवढा प्रतिसाद कधीच मिळाला नाही. पण तुला गाण्याचे काहीही अंग नसताना, भाषेचे ज्ञान नसताना ह्या लोकांना कसे काय खिळवून ठेवले. तू हा अभंग गायला कसा शिकला?”  

बाजीराव ने डोळे मिटले, हात जोडले आणि तो शांतपणे उत्तरला, "बुवा, तुम्ही तर महान आहेत. तुमचा अनुभव, तुमचे ज्ञान खूप मोठे आहे. तुमच्यासमोर मी काहीही नाही. पण बुवा, तुम्हाला हा अभंग माहित आहे. पण मला..."  

"...." बुवाने प्रश्नार्थक चेहरा केला. 

"मला तर माझा संपूर्ण विठ्ठल माहित आहे. तुम्ही गाणे आणि अभंग जाणता. मी विठ्ठलाला जाणतो. विठ्ठल माझ्या हृदयात आहे, अणुरेणूत आहे." बाजीरावाने बोलणे संपवले तसे बुवांनी बाजीरावचे पाय पकडले. 

आणि खाली पटांगणात "जय हरी विठ्ठल" चा जयघोष झाला.    

विनोद बिडवाईक  

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)


रविवार, १६ मे, २०२१

ज्योतिषी आणि रामराव

 गावात, रामराव नावाचा एक कुख्यात टवाळखोर स्वतःच्या कुटुंबियांसह राहत होता. मारामारी करणे, तंबाखू चोळत उगाचच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची टवाळी करणे, शेजाऱ्यांशी भांडण उकरून काढणे अश्यासारखे त्याचे उपद्वयाप चालत असत. त्याची बायको त्याच्या ह्या प्रकाराला पुरती कंटाळली होती.  ७०-८० किलोमीटर दूर असणाऱ्या मध्य प्रदेशाच्या बॉर्डर वरून कापसाची तस्करी करणाऱ्या देशमुखांचा तो उजवा हात होता. गावातील लोक त्याच्यापासून बिचकून असत. कोणी त्याच्या नादी लागत नसे. 

गावात नियमितपणे एक कुडमुड्या ज्योतिषी येत असे. गावातून चक्कर मारून झाल्यावर, आमच्या शाळेचा बाहेर असणाऱ्या कडुलिंबाच्या झाडाखाली तो बस्तान मांडत असे. त्यादिवशी ज्योतिषी आला, गावातून चक्कर मारली, काही बायाबापड्याचे हात बघून भविष्य आणि उपाय सांगितले. कोणातरी कडे दुपारचे जेवण केले. बाहेरच्या गावातून आलेल्या अगदी अनोळखी लोकांना जेवण मिळत असे. जेवणाच्या वेळी कोणी आले तर कोणीही उपाशी जात नसे. थोड्यावेळाने त्याने आमच्या शाळेजवळील कडुलिंबाच्या झाडाखाली त्याचे दुकान मांडले. 

रामराव सायकलवरून तालुक्यातील ठिकाणाहून परत येत होता. त्याने ज्योतिष्याला बघितले. सकाळपासून त्याला कोणी बकरा भेटला नव्हता. त्यामुळे त्याने आपला मोर्चा बिचाऱ्या ज्योतिष्याकडे वळवला. 

"राम राम." सायकल स्टॅन्ड वर लावत रामरावाने ज्योतिष्याला नमस्कार केला. 

"राम राम." ज्योतिष्याने प्रतिसाद दिला.   

थोडी इकडची तिकडची विचारपूस झाल्यावर रामरावाने विचारले. 

"तुम्ही लोकांना भविष्य सांगता. उपायही सांगता, तुम्हाला लोकांचे भवितव्य माहित आहे, पण तुमचे का नाही? उन्हातान्हात फिरत असता, एवढे कष्ट करता, त्यापेक्षा स्वतःचे भविष्य बघून का उपाय करत नाही?”

“बेटा, मला माझे भविष्य चांगलेच माहीत आहे. पण जे प्राक्तनात आहे तेच होणार. मला माझ्या नियतीला सामोरे जावेच लागेल. मी फक्त उपाय सांगू शकतो, पण स्वतःची नियती स्वतःलाच भोगावी लागते.” ज्योतिषाने उत्तर दिले.

अर्थात हे सर्व रामरावच्या डोक्यावरून गेले असावे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ज्योतिषाने बरोबर ओळखले. हुशार ज्योतिष्याने रामरावच्या स्तुतीचा डाव टाकला. रामरावच्या चांगल्या गुणांची यादीच त्याने वाचून दाखवली, शेवटी रामराव कष्ट किती करतो आणि त्याची कदर कोणालाच का नाही हे वाक्य त्याने फेकले.   

रामरावाला थोडे बरे वाटले. "बरे, मला सांगा, एक महिन्यानंतर माझी नियती कशी असेल.?" त्याने विचारले.   

ज्योतिषाने रामरावचा हात पाहिला; त्याला जन्मतारीख विचारली, सर्व तपशील विचारले, पंचांग बघितले, कागदावर काहीतरी खोडखाड केली, आणि शून्यात नजर लावली. 

रामरावची सहनशक्ती संपत आली होती. "अहो सांगा की." त्याने जरबेने विचारले.  

“माझ्यावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका. पुढच्या महिन्यातील पहिल्या सोमवारचा सूर्य काही तुम्ही ह्या गावात, बघू शकणार नाही." ज्योतिषाने रामरावला सांगितले. 

रामराव चकित झाला, रागावून त्याने विचारले, “काय? तू मस्करी करतोयस का?”

“नाही बेटा, मी मस्करी करीत नाही, मला माहित नाही, ते घडेल की नाही, पण माझे आडाखे काढू चुकत नाहीत." गूढपणे ज्योतिषी उत्तराला. खरंतर रामरावचा अश्या गोष्टीवर विश्वास नव्हता. पण त्याने थोडा विचार केला आणि ज्योतिषाला अकरा रुपये देऊन त्याहून निघून गेला.

असे काही होणार नाही असे रामरावाला वाटत होते. पण नंतर तो काही जुन्या घटना आठवू  लागला. देशमुख कापूस खरेदी करायच्या आधी मुहूर्त का बघतो? प्रत्येक महत्वाची गोष्ट करायच्या आधी, मुहूर्त बघतात. हजार लोक भविष्य बघतात, पण सर्वांचे भविष्य थोडे खरे होते? पण त्यातल्या २५% लोकांचे तर खरे होत असेल, आणि त्या २५% टक्क्यात आपणच असलो तर? ह्या विचारानेच रामराव घाबरला.  

दुसऱ्या दिवसापासून तो अबोल झाला. बायकोला काही कळेना, पण त्याची बडबड ऐकल्यापेक्षा त्याचे न बोलणे तिला आवडले. काही झाले का, तब्येत बरोबर नाही का, वगैरे ह्या तिच्या प्रश्नावर त्याने फक्त, "काही नाही" असे उत्तर दिले. थोड्या वेळाने त्याने त्याच्या दोन लहान मुलांना जवळ घेतले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांना संत्र्याच्या गोळ्या घेण्यासाठी पैसे दिले. संध्याकाळी स्वयंपाकघरात जाऊन बायकोला विचारले की ती कशी आहे? पत्नीलाही आश्चर्य वाटले, कारण रामराव आपल्या बायकोची आणि मुलांची एवढी विचारपूस करत नसे. 

त्या दिवसापासून रामरावच्या पत्नी आणि मुलांचे आयुष्य बदलले. गावातील लोकांना स्वतःहून येत जात नमस्कार करू लागला, वडीलजनांना मान देऊ लागला. त्याची भांडणे बंद झाली. शेजारी-पाजारी शांतपणे नांदू लागली.  रामरावांच्या वागणुकीत उल्लेखनीय बदल झाल्याने गल्लीत शांतता नांदू लागली. 

एक महिन्यानंतरचा पहिला सोमवार जवळ येत होता आणि अचानक शनिवारी शेजारच्या गावातून त्याचा सासरा आजारी असण्याचा निरोप रामरावला कोणीतरी दिला. रामराव बायकापोरांना घेऊन सासुरवाडीला निघून गेला. सासऱ्याला तालुक्याच्या दवाखान्यात ऍडमिट करण्यापासून, सासुरवाडीची शेतीची कामे मार्गी लावण्याचे सर्व काम रामरावलाच करावे लागले. ह्या सर्व गडबडीत सोमवारपण निघून गेला. एकदोन दिवसानंतर जेवण झाल्यानंतर रामराव सुपारी कातरत बसला होता, गावाला परत जायला हवे असा विचार करत असताना त्याला त्या ज्योतिष्याने सांगितलेले भविष्य आठवले.

"च्या मारी कुडमुड्याच्या" असे पुटपुटत रामरावाने अडकित्त्याखाली सुपारी जरा जोर लावूनच फोडली. 

एका महिन्यानंतर, कुडमुड्या कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेला दिसला. 

"तुमचे भविष्य मी खोटे ठरवले." रामराव बोलला. 

"तुला आता कसे वाटत आहे?" ज्योतिषाने विचारले.

"मजेत आहे मी, पण तुम्ही मला सांगितले होते की मी ह्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी मरेन, आता दोन महिने झाले आणि मी जिवंत आहे."

"पण मी तुझ्या मरण्याचे भविष्य सांगितले नव्हतेच."

"काय राव, तुम्ही काय म्हणाले होते, की 'पुढच्या महिन्याचा पहिला सोमवार मी बघणार नाही.'

"हो, पण 'ह्या गावात' पहिला सोमवार बघणार नाही असे म्हणालो होतो आणि पहिल्या सोमवारी कोठे होतास?'. ज्योतिषी हसत उत्तराला. 

"अरे हो, मी तर शनिवारीच सासुरवाडीला गेलो होतो, सासरा आजारी होता, त्या गडबडीत आठवडाभर तेथेच होतो."

"ह्याचा अर्थ काय? तू महिन्याचा पहिला सोमवार ह्या तुझ्या गावात बघितला नाही. म्हणजे माझे भविष्य खरे झाले. आहे की नाही." ज्योतिषी जोरात हसला.

रामरावाने कोपरापासुन हात जोडले. 

“आधी मला सांगा आता आयुष्य कसे सुरु आहे?”

"मजा आहे, पण एक सांगू का, माझी कटकट कमी झाली, गावातील लोक मला मान देतात आता. बायकोसोबतची भांडणे नाहीत, शेजारी पाजारी, कसाकाय रामभाऊ म्हणून स्वतःहून विचारतात." रामरावाने सांगितले.

"पण हे झाले कसे?"

"काय सांगू, तुमच्या भविष्यावर माझा विश्वास नव्हता, पण मनात थोडी भीती होती. मरण आलेच तर काय ह्या विचाराने, मी थोडा का होईना, घाबरलो होतो. त्यामुळे, माझे सर्व लक्ष त्या "सोमवार" वर होते. काही झालेच तर कश्याला भांडणे, कटकटी म्हणून, ते सर्व बंद केले, लोकांशीही चांगले वागू लागलो, आणि तेही प्रतिसाद देऊ लागले. सासरा आजारी होता, तेव्हा सर्व काही केले, सासूला मदत केली, त्यांची शेतीची कामे मार्गी लावली." 

“रामरावभाऊ, आयुष्य कसे चांगले आहे ते पहा. आपण जे काही करतो ते आपल्याला परत मिळते आणि आपण जसे जग बघतो, तसेच आपल्याला जग वाटते. तुम्ही विचार बदलला, तुमची जगाकडे बघण्याची तुमची दृष्टी बदलली आणि लोकांची तुमच्याकडे. शेवटी सर्व आपल्या हातातच आहे." ज्योतिषी उत्तरला. 

'खरे आहे." रामरावाने नकळत आपले हात जोडले.

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)

रविवार, २५ एप्रिल, २०२१

रँडम ग्रेड

शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांची मोठी सभा भरली होती. काही जण डबल बार वर बसले होते, काही जण खाली, काही जण जवळच्या पारावर. हे सर्व विद्यार्थी आठवी आणि नववीचे होते. विषय गंभीर होता. प्रत्येक जण तावातावाने बोलत होता, आपल्यावर अन्याय झाला असे त्यांना वाटत होते. ह्या विद्यार्थ्यांत काही विद्यार्थी असेही होते की ते मनापासून ह्या सभेत सहभागी झाले नव्हते. परंतु काही विद्यार्थ्यांनी भावनिक आवाहनाद्वारे, अर्थात भीती दाखवून सर्वाना एकत्र आणले होते. उद्या तुमचे काही प्रश्न निर्माण झाले, कोणी तुम्हाला मारले, तर आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुम्हाला मदत करणार नाही असे ते भावनिक आवाहन होते.

विषय पिटी कम स्पोर्टच्या सोनार सरांनी दिलेल्या ग्रेड चा होता. सोनार सर, असे काही बाही करत असत. ते बऱ्याचदा शाळेत येत नसत. मद्यप्राशन हे त्यांचे आवडीचे पेय होते आणि शिट्टीच्या दोरीने पायावर फटके मारणे हा त्यांचा छंद. शिट्टीच्या दोरीचा कंटाळा आला तर ते कधी कधी कंपाउंडच्याजवळ असणाऱ्या झाडाचे हिरवे फोक वापरत असत. तेव्हा ते पायांपेक्षा, पाठीवरच जास्त पडत असत. अर्थात त्याच्याजवळ हुशार, मठ्ठ, गरीब, श्रीमंत, जातपात असा काही भेदभाव नसे. त्यांच्यासमोर जो असेल आणि हातात जो येईल, त्यांच्यावर ते आपली कृपा करत असत. 

तर ह्या सोनार सरांनी आठवी आणि नववीच्या सर्व मुलांना सहामाही मध्ये ज्या ग्रेड दिल्या होत्या त्या खेळातील, इतर मैदानी उपक्रमातील आणि एक्सट्रा कॅरिक्युलर कार्यानुभवाच्या कामगिरीचा, विध्यार्थ्यानी घेतलेल्या प्रयत्नांचा विचार न करता, कामगिरीचा कोणताही निकश न लावता, रॅन्डमली, ग्रेडस दिल्या होत्या. 

अर्थात आतापर्यंत आम्ही ह्या ग्रेड कडे कधीच लक्ष दिले नव्हते. विद्यार्थी याबाबत सरांवर विश्वास ठेवत असत. स्पोर्ट्स आणि कार्यानुभव मध्ये कोणतीही ग्रेड मिळाली की त्याचे सुख दुःख नसायचे. त्यामुळे आताच हा विषय का तापला? 

त्याचे झाले असे की सोनार सर ज्या घरात भाडयाने राहायचे, ते घर राजेश तनपुरे ह्याच्या काकाचे होते. एका संध्याकाळी, सोनार सर नुकतेच गावाच्या बाहेर असणाऱ्या बाबू तावडेच्या खुल्या आवारातील गावठी मदिरालयात जाऊन आले होते. घराच्या बाहेरील ओट्यावर ते बसले होते. अर्थात त्यांची मस्त तंद्री लागली होती. घेतलेल्या स्पिरिट ने त्यांना स्पिरिच्युअल उंचीवर नेवून ठेवले होते. राजेश तेथेच होता. 

 "काय सर, मजेत ना." राजेश ने विचारले,

"हे तू मला काय विचारतोस? मी तर मजेतच असतो, तू काय करतोस? सहामाहीच निकाल कसा आला तुझा?" त्यांनी हसत विचारले.

"काय सर, माझा निकाल असा काय सांगण्यासारखा असतो का? पण एक प्रश्न आहे," राजेश,

"हं, विचार,"

"स्पोर्ट्स आणि कार्यानुभव ह्या रकान्यात "D" असे लिहिले आहे. असे का? मी तर शाळेचा कब्बडीच्या टीम चा कॅप्टन आहे." राजेश ने विचारले. 

"ते तसेच असते, मी कोणाला काहीही ग्रेड देतो. रॅन्डमली," ते हसत उत्तरले,

" रॅन्डमली? पण का?" राजेश ने थोडे रागावून विचारले. 

"To teach you students that life is unfair." ते एक तत्ववेत्त्याच्या आवेशात बोलले.  "आयुष्य हे कठीण आहे बाळा. तुला जे योग्य वाटते ते दुसऱ्याला अयोग्य वाटू शकते आणि तुला जे अयोग्य वाटते ते योग्य." 

"पण का?" राजेश वैतागत बोलला.  

"तू योग्य असला तरी कोणीतरी तुला अयोग्य दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि अयोग्य व्यक्तीला योग्य. नियती नेहमीच न्याय्य असते असे नाही." सरांची वाणी आता अमृतरस पाझरू लागली होती. 

"ती नियती गेली खड्ड्यात, ग्रेड काय असे रॅन्डमली देतात का कधी? ते जावू द्या, तुम्ही हे बदलून देणार का नाही?" राजेश आता रागावला होता. 

"नियती कधीही बदलत नसते." आतून बायकोने जेवायला या, असा आवाज दिला म्हणून सर घराच्या आत गेले. 

राजेश चडफडत घरी गेला. त्याने ठरवले की, रॅन्डमली ग्रेड देणे अन्याकारक आहे आणि आपण आवाज उठवलाच पाहिजे. सरांच्या ह्या रँडम फॉर्मुल्यामुळे मात्र काही विद्यार्थीचा फायदाही झाला. स्पोर्ट्स मध्ये यथातथा असणाऱ्या विद्यार्थीना चांगली ग्रेड मिळाली होती.   

सरांचा रँडम फॉर्मुला सगळीकडे पसरला. ही बातमी ऐकून मग प्रत्येकाने आपले गुणपत्रक तपासून बघितले. सरांच्या विरुद्ध आता जनमत तयार होऊ लागले. एके दिवशी शाळा सुटल्यावर सभेचे आयोजन निर्णय आले. 

राजेश ने आवेशपूर्ण भाषण दिले, सर्व माहिती विद्यार्थीना दिली. शेवटी त्याने सरांच्या निषेधाची घोषणा दिली. 

"सोनार सरांचा...' ह्या घोषणेवर काहीजणांनी "निषेध असो, तर काहीजणांनी विजय असो" असा प्रतिसाद दिला. कदाचित ज्यांना A, B ग्रेड मिळाल्या त्यांनीच विजयाच्या घोषणा मुद्दामून दिल्या असाव्यात.

दुसऱ्यादिवशी काही विद्यार्थी सोनार सरांकडे गेले. त्यांना ग्रेड परत तपासून देण्याची विनंती केली. त्यांनी ती नेहमीप्रमाणे धुडकावून दिली. शेवटी सर्वजण मुख्याध्यापकांना साकडे घालायला गेले. त्यांनी सर्वाना ऐकून घेतले आणि ह्यावर योग्य तोडगा काढण्याची ग्वाही दिली.

कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली ही बातमी प्रसिद्ध झाली; विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निर्णय घेण्यात येईल असेही सांगण्यात आले. ह्या प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर मन लावून अभ्यास, तयारी केली असेल, त्याच्या मनात काय द्वंद असेल हे आपल्याला खरंच माहित नाही.

सरांनी आम्हाला "Life is unfair" चा धडा नक्की दिला. परंतु ह्या विध्यार्थ्यांना सोनार सरांसारखे रँडम ग्रेड देणारे शिक्षक न भेटो हीच शुभेच्छा!

रविवार, १८ एप्रिल, २०२१

बेयंत सिंगला शिक्षा

अभ्यासाव्यतिरिक्त इतर अवांतर अश्या गोष्टी शाळेत फारश्या नसत. शाळा सुरु झाली की प्रार्थना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा झाली की मग शाळेचे तास सुरु होत आणि सायंकाळी पाचपर्यंत चालत असत. शनिवारी पीटी चा तास असे. आमचे पीटीचे सर मनात आले तर कवायती घेत असत. खूपदा ते मद्य पिऊन बाहेर कोठेतरी पडलेले असत. वर्षातून कधीतरी क्रीडा स्पर्धा होत असत, कबड्डी, व्हॉलीबॉल, रिंग, खो खो असे ते खेळ असत. मग त्याची प्रॅक्टिस शाळा संपल्यावर होत असे. व्हॉलीबॉल हा माझा आवडता खेळ. मुख्यतः मी सर्व्हीस करत असे. 

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्रदिन साजरे होत असत तेव्हा काही कार्यक्रम होत असत. मी शाळेच्या बँडपथकात होतो. मला तो मोठा ढोल वाजवायला आवडत असे, पण सरांनी बासरीवादनाचे काम आम्हा मुलाकडे दिले होते. ती स्टीलची बासरी मला कधीच वाजवता आली नाही, टीमवर्कचा एक फायदा असतो. इतरांच्या सुरात सूर मिळवून मी ती बासरी वाजवत असे. प्रजासत्ताक दिनानिमित्त एक हस्तलिखित विशेषांक निघत असे. माझे अक्षर त्यावेळेस खूप छान होते, ह्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण माझ्या शुद्धलेखनाच्या वहीला पारितोषिक मिळालेले आहे. माझे अक्षर चांगले असल्यामुळे, विशेषांकाचे हस्तलिखित लिहिण्याचे काम माझ्याकडे आणि इतर चांगले अक्षर असणाऱ्या विद्यार्थ्याकडे येत असे. 

हे सर्व सोडले की मात्र आम्हाला अभ्यास एके अभ्यास असे. गावातील इतर मुलांना फारसे अभ्यासाबद्दल काही वाटत नसे. पण शाळेतील हुशार मुलाकडून फार अपेक्षा असायच्या. 

कधीतरी जेव्हा आम्ही दुसऱ्या मोठया गावात किंवा शहरातील शाळेत शिष्यवृत्ती, जिल्हास्तरीय गणित, ड्रॉईंग वगैरे परीक्षेसाठी आम्ही जात असू, तेव्हा त्या मुलांचा चुणचुणीत पणा बघून आम्हाला न्यूनगंड वाटत असे. काय मस्त बोलायची ती मुले. वादविवाद स्पर्धा, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा ह्या केवळ आम्ही ऐकून असायचो. शाळेत ह्या गोष्टी आयोजित करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असा आमच्या शिक्षकांचा समज होता.

आमची शाळा ज्या संस्थेची होती त्या संस्थेच्या मुख्य कार्यालय आणि मोठी शाळा ज्या ठिकाणी होती त्या करजगाव गावी एक विज्ञानप्रदर्शन आयोजित केले गेले होते. रसायनशास्त्रIच्या काकड सरांनी ठरवले की मी ह्या प्रदर्शनात भाग घ्यावा. सोबत वरच्या वर्गातील दोन विद्यार्थ्याना पण त्यांनी तसे सांगितले. आम्ही खूप चर्चा केली, परंतु काय करावे हे कळत नव्हते, शिवाय प्रयोगासाठी सामुग्री जमा करणे हे मोठे काम होते. 

त्यावेळेस देश्याच्या पंतप्रधान इंदिरा गांधींचा नुकताच खून झाला होता. बेयंत सिंग ह्या मारेकऱ्याला अटक करण्यात आली होती. ह्या बेयंत सिंग बद्दल आमच्या मनात कमालीची चीड होती. विषय ताजा होता. 

चर्चेच्या दरम्यान मी म्हणालो. "आपण बेयंत सिंग ला शिक्षा देण्याचा प्रयोग करू या."

"चल काहीतरीच, हा काय प्रयोग आहे? तू काय फाशीचा प्रयोग दाखवणार आहेस?" एकाने विचारले.

"नाही, आपण फाशी नाही द्यायची."

"मग?"

काकड सरांनी नुकतेच वेगवेगळे वायुरूप पदार्थ जसे, ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साईड, हायड्रोजन क्लोराईड तयार करण्याचे प्रयोग करून दाखवले होते. 

"आपण त्याला, कार्बनडायऑक्साईडने मारायचे."

"कसे?"

"आपण कार्बनडायऑक्साईड आणि इतर वायू बनवायचे. कार्बनडायऑक्साईड नळीने एक जार मध्ये सोडायचा, आणि त्या जार मध्ये बेयंत सिंग ला बुडवून ठेवायचे. सोबत आपण वेगवेगळे वायू बनवायचे, त्याचे प्रयोग दाखवायचे आणि शेवटचा प्रयोग हा दाखवायचा. हे वायूद्रव बनायची पद्धत आणि त्याचा उपयोग सांगायचा आणि मग कार्बनडायऑक्साईड ने बेयंत सिंग ला मारायचे." मी माझा प्लॅन सांगितला.

"आणि बेयंत सिंग ला कोठून आणणार?" राजेश ने प्रश्न विचारला 

"सरदारजीची बाहुली आहे माझ्या बहिणीची." विजय उत्तरला. 

खरंतर आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधनात हाच प्रयोग शक्य होता. वायू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आम्ही शाळेतून घेणार होतो. सरांना हि कल्पना सांगितली.  त्यांना ती फारसी आवडली नसावी पण आम्ही हे सर्व प्रयोग एवढ्या उत्कटतेने सांगितले की त्यांनी आमच्या ह्या प्रयोगाला सहमती दिली. 

आम्ही तयारी सुरु केली. वायू तयार करण्याचे साहित्य, प्रक्रिया ह्यांचे हस्तलिखित पोस्टर्स बनवले. त्याचबरोबर, "बेयंत सिंगला शिक्षा. बघण्यासाठी भेट द्या स्टॉल न. १२, आयोजक म्हणून आम्ही आमचे आणि शाळेचे नाव टाकले. आमची तयारी पूर्ण झाली. आम्ही प्रदर्शनाच्या गावी गेलो. आदल्या रात्री आम्ही आमच्या मुख्याध्यापकांच्या घरी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रदर्शनस्थळी जाऊन प्रयोगाची मांडणी केली, पोस्टर्स लावले. प्रवेशद्वाराजवळ बेयंत सिंग च्या शिक्षेचे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 

थोड्या वेळाने प्रदर्शनाचे उदघाटन झाले. प्रमुख पाहुणे आले, त्यांनी जुजबी माहिती करून घेतली. हळूहळू इतर विध्यार्थी, पालक, नागरिक येऊ लागले. मोठ्या नाटकीपणे दर अर्ध्यातासांनी आम्ही वायू कसे बनतात त्याचे प्रात्यक्षिक देऊ लागलो. प्रयोग झाल्यावर मग विजय मोठया आवाजात नाटकी आवाजात जाहीर करे, "आता बेयंत सिंग ला आपण कार्बनडायॉक्साईड देऊन शिक्षा देऊ या." असे म्हणत तो सरदारजीच्याची बाहुली पाण्याचा जार मध्ये वरून खाली ढकलत असे, त्याच्या नाकातून बुडबुडे येत. मग आम्ही त्या जारमध्ये कार्बनडायॉक्साईड सोडत असे, हवेच्या दबावामुळे बेयंत सिंग गटांगळ्या खात असे. आणि थोड्या वेळाने, बुडबुडे संपून तो तळाला लागत असे.

आमचा हा प्रयोग तुफान प्रसिद्ध झाला. प्रदर्शनातील इतर प्रयोग खूप चांगले होते. काही शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी पैसे खर्च करून छान मॉडेल्स बनवले होते, त्यांचे प्रयोगही उत्कृष्ट होते. परंतु आमचा प्रयोग लोकप्रिय ह्या प्रकारात मोडणारा होता. सगळीकडे बेयंत सिंगची शिक्षा हा चर्चेचा विषय झाला होता. गावातील मोठी माणसे, बायबापूडे, हा प्रयोग बघायला मोठी गर्दी करू लागली. दोन दिवसांनी प्रदर्शनाचा निरोप होता आणि उत्कृष्ट प्रयोग, मॉडेल ला पारितोषिक जाहीर होणार होते. 

"बेयंत सिंगला शिक्षा" ह्या प्रयोगाचा उल्लेख प्रत्येक भाषणात होता. परंतु जेव्हा पारितोषिक जाहीर व्हायला लागले, तेव्हा मात्र आमचे नाव येत नव्हते. पहिले, दुसरे, तिसरे, उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर होत होते. आमचे नाव कोठेच नव्हते. आम्ही तिघेजण निराश होऊन, चेहरे पडून बसलो होतो. आपला प्रयोग एवढा प्रसिद्ध होऊन सुद्धा आपल्याला काहीच कसे नाही? ह्याचा विचार करून आम्ही नाराज झालो. 

शेवटी उद्घोषकाने आमचे आणि आमच्या शाळेचे नाव जाहीर केले. आम्हाला विशेष पारितोषिक जाहीर झाले होते. तुफान टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाजात मोठ्या अभिमानाने आम्ही पारितोषिक घ्यायला व्यासपीठावर गेलो.   

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.) 

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

तहान

खरंतर त्या लहान वयात जातपात हा काय प्रकार हे काहीच माहीत नव्हते. आम्ही सर्व मुले एकत्र खेळात असू. बारा बलुतेदार पद्धतीचा थोडाफार काय तो पगडा होता. त्यामुळे आमच्या आडनावापेक्षा वडिलांच्या कामावरून आम्हाला हाक मारल्या जात असत. सर्वांचे कुटुंब त्यांच्या व्यवसायावरून ओळखले जात. शिवाय कोणाचा उल्लेख करताना फारसा आदर वगैरे दिल्या जात नसे. खेळत असताना अर्थात एकमेकांचा उद्धार करायचा असेल तर तो वडिलांच्या नावावरून आणि व्यवसायावरून. माझी आई अतिशय धार्मिक तर वडील एकदम नास्तिक.  प्रत्येक सण, प्रत्येक विधी साजरा करण्याचा तिचा प्रयत्न असे. त्यामुळे बऱ्याच छोटामोठ्या गोष्टी मला माहीत झाल्या. त्यामुळे मांसाहार आम्हाला वर्ज होता. अंडे, मासे, मटण, चिकन हे केवळ ऐकून. अर्थात मला पण अश्या आहाराचे आकर्षण कधीच झाले नाही. जिवंत प्राणी अथवा पक्षी मारून खाणे हे माझ्या मनातही कधी आले नाही. 

ह्या सर्व वातावरणामुळे, घरात किंचित सोवळे पाळले जायचे. अर्थात त्याचा अतिरेक नव्हता. गावातील काही गावकुसाबाहेरील विशीष्ट समाज गाईचे मांस खात असे, हे इतर लोकांना आवडत नसे. पण ते तेवढ्या पुरतेच.

एकदा एक गावकुसाबाहेरील बाई कामानिमित्त आईला भेटायला आली. गप्पा सुरु झाल्या. बाईला तहान लागली असावी, अंगणात एक बाजूला एक पेला ठेवलेला होता. आईने तिला तो पेला दिला, त्यात माठातून पाणी ओतले. परंतु त्या बाईला ते आवडले नसावे. अंगणात ठेवलेला पेला दिलेला तिला आवडला नाही. आमच्या घराचे दार नेहमी उघडे असायचे. रस्ताने कोणी जात असले तर ओळखीचे लोक हाक मारायचे, विचारपूस करायचे, दारावर येणारे विक्रेते असायचे, तेही ओळखीचे झाले होते त्यामुळे कोणाला पाणी वगैरे प्यावयाचे असेल तर आत येऊन ते पीत असत. तो पेला त्यासाठी वेगळा ठेवलेला होता. 

त्या बाईचा काहीतरी गैरसमज झाला आणि ती पाणी न पिताच निघून गेली. बाई पाणी न पीता निघून गेली ह्याचे आईला खूप वाईट वाटले. एखादी व्यक्ती दारावरून पाणी न पीता निघून गेली ह्याची चुटपुट आईला लागून राहिली. 

दोन तीन दिवसानंतर आईने त्या बाईला तिच्या घरी जाऊन जेवणाचे आमंत्रण दिले. क्षणभर ह्यावर तिचा विश्वासच बसला नाही. परंतु आढेवेढे घेत ती तयार झाली. ती आली तेव्हा आईने मोठ्या आस्थेने तिची चौकशी केली. तिला हळदी कुंकू देऊन एक चोळीचा खण दिला आणि तिला जेवू घातले. तिला समजून सांगितले की त्यादिवशी तिला देण्यात आलेला पेला हा जाणूनबुझून दिला नव्हता. ती बाईच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. डोळे पुसत ती म्हणाली, "आज तुमच्यामुळे माझा माणुसकीवरील विश्वास परत आला. नाहीतर आम्हाला अशी वागणूक कोणी देत नाही. आमच्याशी लोक धड बोलत नाहीत, जेवू घालायची गोष्ट तर दूरच. पण सर्व लोक सारखे नसतात हेच खरे. " 

त्याकाळी समाजातील जातीपातीचा पगडा खूप भक्कम होता. गावकुसाबाहेरील समाजाबद्दल तर खूपच अनास्था लोकांना असायची. अश्या वातावरणात आईने तो पगडा पुसण्याचा एक प्रयत्न केला. हि एक प्रकारची छोटीशी क्रांतीच म्हणावी लागेल.

विनोद बिडवाईक 


(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.) 

रविवार, २४ जानेवारी, २०२१

डॉक्टर

डॉ नामदेव बदरके आमच्या गावातील सर्वांचे डॉक्टर होते. माझे इतर मित्र त्यांना काका म्हणून बोलावयाचे. ते आमचे शेजारी होते. माझ्या आई बाबांना ते काका काकी म्हणत, म्हणून मी त्यांना भाऊ म्हणत असे. नदीपलीकडे त्यांचा दवाखाना होता पण त्यांचा दवाखाना हा फक्त नावालाच होता, कारण दवाखान्यात ते खूप कमी असत. असत तेव्हा सोबत पाच सहा लोकांचा राबता असे. अर्थात हे लोक रुग्ण म्हणून येत नसत तर नामदेव भाऊ सोबत गप्पा मारायला येत असत. नामदेव भाऊ गावाचे सरपंच पण होते, त्यामुळे तेथे भारतातील राजकारणाबद्दल चर्चा रंगलेली असायची. तसेच गावातील प्रश्न त्याचा दवाखान्यात चर्चेला येत असत.  चर्चेला काळवेळ ह्याचे काहीही बंधन नसायचे. गावातील आबालथोर, श्रीमंत गरीब, लहान मोठे ह्या सर्वांचा राबता त्या दवाखान्यात असे. ह्या गडबडीत काही रुग्ण पण येत असत. गप्पा मारत मग डॉक्टर रुग्णांची तपासणी करत असत. 

"बोला काय झाले काका?" डॉक्टर विचारत,

"कालपासून पोटात कसंतरीच होते." रुग्ण 

"अरे रामराव, त्या बाईचं आता खरं नाही? " डॉक्टर रामराव किंवा तत्सम व्यक्तीकडे बघत इंदिरा गांधींबद्दल आपले मत मांडायचे. रुग्ण बिचारा थोडा वेळ गोंधळात पडायचा.

"काय खाल्ले काल?" डॉक्टर (हे रुग्णाला) 

"काल जरा उशिरा जेवलो, पण नेहमीचेच." रुग्ण,

"पण तिच्या लोकांची  खाण्याची सवय अशी जाणार नाही, आता धडा शिकवावाच  लागेल." अर्थात हे रामराव कडे बघून.

रुग्ण एकदम दचकून डॉक्टर कडे बघत असे. डॉक्टर अशीच जुजबी माहिती विचारायचे. नंतर हळूहळू रामराव आणि रुग्ण डॉक्टरच्या बोलण्यावरून कोणासाठी काय आहे हे समजून घ्यायचे. मधेच कोणीतरी मुलगा त्यांना घरी बोलवायला यायचा. त्याच्या घरी कोणीतरी म्हातारे माणूस गंभीर आजारी असे. मग दवाखान्यातील रुग्णाला दोनतीन गोळ्या देऊन पिटाळून लावायचे. तू हो पुढे, असे त्या मुलाला म्हणत, डॉक्टर बॅग हातात घ्यायचे, रामराव मग कोणतातरी प्रश्न विचारायचा. डॉक्टरांना परत चेव यायचा, गप्पाच्या ओघात आपल्याला कोठे जायचे हे पूर्ण विसरून गेलेले असायचे. एक तास झाले की परत तो मुलगा येत असे आणि मग डॉक्टरांचा नाईलाज व्हायचा.  एक मात्र निश्चित त्यांच्या हाताला गुण होता. रुग्ण हमखास बरा होत असे. नामदेवभाऊ ह्यांच्याकडे मेडिकल ची औपचारिक पदवी नव्हती. त्यांचे वडील गावातील नावाजलेले आणि प्रभावी वैद्य होते. त्यांचा वारसा नामदेव भाऊ ह्यांनी घेतला होता. आयुर्वेदातील औषधें ते देत असत. RMP ची पदवी ते नावामागे लावत असत. गावातील साधे, छोटे मोठे उपचार तेच करत असत.   

जेव्हा ते घरी अथवा दवाखान्यात नसत, तेव्हा ते राजकारणी लोकांसोबत असत. डॉक्टरभाऊ ची विचारसरणी डावी होती. भाई सुदाम देशमुख ह्यांचे हे खंदे समर्थक होते. गावातील श्रीमंत आणि विशिष्ट समाज वगळता सर्वांचा त्यांना पाठिंबा असे आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ते हमखास निवडून येत आणि तेच गावाचे सरपंच होत असत. त्याचा राजकीय प्रभाव संपूर्ण तालुक्यात होता. गावातील राजकारण करत असताना डॉक्टर म्हणून लोकांची सेवा ते मनोभावे करत असत. आतासारखा डॅम्बीसपणा लोकांत नव्हता. सरकारकडून पैसा फारसा येत नसे. विकासकामांच्या नावाखाली आतासारखा भ्रष्टाचार माजला नव्हता. डावी विचारसरणी असल्यामुळे तळागाळातील माणसे नेहमी त्याच्याकडे येत असत आणि त्याचे ते प्रश्न मार्गी लावत असत.

एकदा ते घरातून बाहेर पडले, आई ओट्यावर काहीतरी करत बसली होती. "काय काकी, बरे आहे ना?" असे त्यांनी विचारले. आईला बरे नसले की ते औषधें देत असत. "अरे ये नामदेव" मग काय, डॉक्टर आले, बसले, गप्पा सुरु झाल्या. आईला पण गप्पा मारायला खूप आवडत असे. आईने चंची उघडली. सुपारी कातरत पान वगैरे खाऊन झाले. गप्पाच्या ओघात चहा पण झाला. आणि अचानक त्यांना आठवले. गावातील कोणातरी कडे गंभीर आजारी रुग्ण आहे आणि त्यांना बघायला बोलावले आहे. ते उठले आणि वेगाने चालायला लागले.   

"वाचला असेल तर चांगली औषध दे रे बाबा त्याला." आई मिश्कीलपणे हसत ओरडली.   

"हो हो, वाचला असेल तर." डॉक्टर बोलले.

नंतर कधीतरी, डॉक्टर पंचायत समितीचे उपसभापती झाले. जेव्हा ते उपसभापती झाले तेव्हा गावात दिवाळी साजरी झाली. पण दोन वर्षात त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला आणि त्यांना ते पद सोडावे लागले. 

त्यांनी आपली शेती आणि दवाखान्यावर लक्ष केंद्रित केले. गावातील राजकारण नंतर संपूर्ण बदलून गेले.

विनोद बिडवाईक 
(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)